गडचिरोली : २१ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडी तसेच शिवसेना-भाजप महायुतीचे नेते जिल्हा परिषद निवडणुकीच्या समीकरण जुळवणीत व्यस्त असल्याने विधानसभा निवडणुकीचा ज्वर अद्याप तापलेला नाही. २० तारखेला प्रशासनाची विधानसभा निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. २१ ला रविवारी जिल्हा परिषदेत नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष विराजमान झाल्यानंतर गडचिरोली, आरमोरी, अहेरी या तिनही विधानसभा मतदार संघात निवडणूक वातावरण तापण्यास सुरूवात होईल.जिल्ह्यात यंदा गैरआदिवासी मतदारांमध्ये विधानसभा निवडणुकीविषयी कमालीची उदासीनता आहे. मतदान करून आपले प्रश्न सुटत नसतील तर अशा लोकप्रतिनिधींना निवडून देण्यात काय फायदा, असा युक्तीवाद गैरआदिवासी मतदारांकडून केला जात आहे. पेसा कायद्याची अंमलबजावणी जिल्ह्यात झाल्यामुळे गैरआदिवासी मतदार नोटा वापरण्याच्या भूमिकेवर आला आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीत असलेल्या इतर प्रवर्गाच्या उमेदवारांना मैदानात उतरविण्याची तयारीही काही सामाजिक संघटनांनी सुरू केली आहे. मोठ्या राजकीय पक्षांनी आपल्या प्रस्थापीत जुन्या चेहऱ्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे नवे मतदार नाराज आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्षात काम करणारे गैरआदिवासी नेतेही अद्याप प्रचारासाठी उतरलेले नाहीत. विद्यमान आमदार दिल्ली, मुंबईत तळ ठोकून आहेत. काही नेते जिल्हा परिषदेतील राजकीय समिकरण जुळविण्याच्या कामात आहे. ५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेत बहुमतासाठी २६ सदस्यांची गरज आहे. तेवढे संख्याबळ कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. त्यामुळे मोठी मोट बांधवी लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच मैदानात खरी गर्दी होईल. २७ तारखेला नामांकन पत्र भरण्याच्या अखेरीस चित्रही स्पष्ट होईल. यंदाची निवडणूक साऱ्याच राजकीय पक्षांचा कस पाहणारी राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जि. प. निवडणुकीनंतर ज्वर तापणार
By admin | Updated: September 18, 2014 23:35 IST