गडचिराेली : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या ३१ मे पर्यंत करण्याबाबतचा शासन निर्णय ७ एप्रिल राेजी निर्गमित करण्यात आला. त्यामुळे मागील दाेन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्या हाेणार आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सन २०२०-२१ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ४० पेक्षा अधिक शिक्षकांनी प्रतिनियुक्त बदल्यांचे आदेश प्राप्त करून घेतले. विशेष म्हणजे हे शिक्षक शहरी भागातील शाळांमध्ये रुजू झाले आहेत.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक बदली प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षी शिक्षकांची बदली प्रक्रिया काेराेना प्रादुर्भावामुळे रद्द झाली. प्रशासनाला ही प्रक्रिया घेता आली नाही. आता ७ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार मे महिन्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यापूर्वीच शहरी भागातील शाळांमध्ये बऱ्याच शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रतिनियुक्त्या मिळवून घेतल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
सन २०१७-१८ यावर्षी जिल्ह्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या माेठ्या प्रमाणात करण्यात आल्या. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून दुर्गम व अवघड क्षेत्रात नाेकरी करणाऱ्या शिक्षकांना इच्छीतस्थळी बदल्या मिळाल्या. त्याचवेळी शहरी भागात मागील २० वर्षांपासून दडून बसलेल्या शिक्षकांच्या दुर्गम भागात बदल्या करण्यात आल्या. त्याच शिक्षकांनी पुन्हा शिक्षण विभागाशी संधान साधून वेगवेगळे आजार व इतर कारणे दाखवून विभागीय आयुक्तांकडे बदलीचा प्रस्ताव सादर केला. प्रतिनियुक्ती बदलीसाठी प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षण विभागासह विभागीय आयुक्त कार्यालयात जाेरदार पाठपुरावा केला. दरम्यान या शिक्षकांनी गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी, देसाईगंज या शहरी भागातील पंचायत समितीमधील सुगम शाळांमध्ये बदल्या करून घेतल्या.
प्रतिनियुक्ती बदली केलेल्या शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षक हे दाेन वर्षांपूर्वीच शहरी भागातील शाळेतून बदली हाेऊन दुर्गम भागात गेले हाेते. आता ऑनलाइन बदल्यापूर्वीच या शिक्षकांनी प्रतिनियुक्ती बदल्याद्वारे जुन्याच पंचायत समितीमध्ये दाखल झाले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून दुर्गम व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय झाला असून काेराेनाकाळात करण्यात आलेल्या या प्रतिनियुक्ती बदल्यांमुळे प्रशासनाविरुद्ध दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
बाॅक्स...
प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी
काेणत्याही शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेची तीन वर्ष आस्थापनेच्या ठिकाणी पूर्ण करणे गरजेचे आहे. साधारणत: तीन ते साडेतीन वर्ष पूर्ण झाल्यावर प्रशासनाच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या शासन नियमानुसार बदली केली जाते. मात्र शहरी भागातील शिक्षक दुर्गम भागातील शाळांमध्ये दीड ते दाेन वर्षांपेक्षा अधिक दिवस सेवा देत नाही. प्रतिनियुक्ती बदली करून साेयीस्कर शाळा मिळवून घेतात. परिणामी दुर्गम व अवघड भागातील शिक्षकांना सुगम तसेच शहरी भागातील शाळांमध्ये सेवा देण्याची संधी प्राप्त हाेत नाही. ऑनलाइन बदल्यापूर्वी विभागीयस्तरावरून झालेल्या शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या बदल्या रद्द करण्यात याव्या, अशी मागणी दुर्गम भागातील शिक्षकांनी केली आहे.