नळ पाणी पुरवठ्यासाठी टिल्लू पंपाचा वापर सुरूच
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दिवसातून दोनदा नळ पाणीपुरवठा नियमित केला जातो. मात्र गडचिरोली शहरात काही नागरिक आपल्या घरच्या नळाला टिल्लू पंप लावत असल्याने इतर नागरिकांच्या घरामधील नळातील पाणी प्रवाह कमी होतो. अनेकांना पुरेसे पाणी मिळत नाही.
शासकीय कार्यालये अस्वच्छतेच्या गर्तेत
गडचिरोली : शहरातील अनेक कार्यालयाच्या इमारतींच्या परिसरात सर्वत्र अस्वच्छता आहे़ मागच्या बाजुने कच्चा रस्ता असून त्यावर घाण, कचरा साठून असतो़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे़ विशेष करून शासकीय इमारतीच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणात घाण पसरली असल्याचे चित्र दिसून येते.
लखमापूर बोरी बाजारात ओट्यांची निर्मिती करा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी हे परिसरातील मोठे गाव असून येथे दर शुक्रवारला आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेकडो नागरिक वस्तूच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र या बाजारात ओट्याची व्यवस्था नसल्याने विक्रेत्यासह ग्राहकांना त्रास होत आहे. त्यामुळे ओटे बांधावेत.
कमाल जमीन धारणेची अट रद्द करा
अहेरी : रोहयोंतर्गत कृषी व सिंचन योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी लाभार्थ्यांना पाच एकरची कमाल जमीन धारणेची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी शेतकºयांवर अन्याय होत आहे. ही अट हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. अनेक शेतकºयांकडे पाच एकरपेक्षा अधिक जमीन आहे. मात्र सदर जमीन सिंचनाअभावी पडीक आहे.
सुगंधित तंबाखूची तस्करी वाढली
गडचिरोली : संपूर्ण राज्यात सुगंधीत तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्यासोबत जोडली आहे. त्यामुळे काही तस्कर छत्तीसगड राज्यातून तंबाखूची तस्करी करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये तंबाखूयुक्त पदार्थांची विक्री केली जात आहे. यासाठी मात्र दामदुप्पट किमत आकारली जात आहे.
निस्तार डेपोअभावी नागरिक त्रस्त
कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही.
पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा कायम
अहेरी : तालुका मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर सकीनगट्टा हे गाव आहे. विशेष म्हणजे वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधासुद्धा उपलब्ध नाही. आलापल्ली-भामरागड मुख्य मार्गावरून १० किमीची पायपीट करून आडमार्गाने या गावाला जावे लागते. पावसाळ्यात नाल्याला पूर येत असल्याने सकीनगट्टा गावाचा बाहेर जगाशी संपर्क तुटतो. पक्का रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
शासकीय विहिरीवर खासगी पंपांचा कब्जा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणीपंप लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाही. ग्राम पंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष होत आहे.
हेमाडपंथी शिव मंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे.अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भूयार जात असून तो भूयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघतो, अशी आख्यायिका आहे.
नियमित तिकीट तपासणीकरिता पथक नेमा
आष्टी : अनेक वाहक प्रवाशांकडून तिकीट काढत नाही. त्यामुळे नियमित तिकीट तपासणी पथक नेमावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दुर्गम गावांत जाणाºया बसफेरीत अनेक वाहक प्रवाशांकडून तिकीट न काढताच पैैसे घेतात.