चामोर्शी-मूल मार्गावरील झुडुपे तोडा
चामोर्शी : भेंडाळा-चामोर्शी-मूल मार्गावर मोठ्या प्रमाणात झुडुपांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या मार्गावरील झुडुपे तोडावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच
आलापल्ली : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यातून अवैध गुटखा विक्रीस आणल्या जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मरपल्ली मार्गाची दुरुस्ती रखडली
अहेरी : अहेरी-सिरोंचा मार्गावरील उमानूरपासून मरपल्लीपर्यंतचा रस्ता ठिकठिकाणची गिट्टी उखडल्याने दुरवस्थेत आहे. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याची दुर्दशा झाली असतानाही सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
अंगणवाड्यांचे बांधकाम अद्यापही अपूर्ण
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्षाच्या वतीने तीन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातून एकूण ४३५ अंगणवाडी केंद्राचे काम मंजूर करण्यात आले. यापैकी ३४२ वर कामे पूर्ण झाले असून, अनेक अंगणवाड्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहेत.
अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता
एटापल्ली : अहेरी उपविभागातील मार्गावर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता झाले आहे. यामुळे रात्री अनोळखी नागरिक तसेच वाहनचालक रस्ता विसरून भलतीकडेच वळतात. संबंधित यंत्रणेने अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे, अशी मागणी होत आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची मागणी
चामोर्शी : नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर चामोर्शी येथील घनकचरा व्यवस्थापनांतर्गत प्रभागवार जमा केलेला कचरा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या व मोठ्या नहराच्या पाळीजवळ तसेच परिसरात टाकला जात आहे. त्यामुळे सर्वत्र घाण दिसून येते.
नवरगाव फाट्यावर प्रवासी निवारा बांधा
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील कुलकुलीच्या पुढे नवरगाव फाट्यावर बसथांब्यावर प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नवरगाव, रामटोला, कुलकुली टोला येथील नागरिकांनी केली आहे. नवरगाव फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने नागरिकांना ऊन, वारा, पावसात बसच्या प्रतीक्षेत उभे राहावे लागते.
कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक कमालीचे त्रस्त
आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपनीच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.
अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा
आष्टी : संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या वतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.
आष्टी येथे पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव
आष्टी : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. प्रशासनाने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आहे.
अस्वच्छ ओपन स्पेसमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला
गडचिरोली : न. प. प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून वॉर्डा-वॉर्डा ओपन स्पेस तयार करून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र या ओपस स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने या ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात आहे. दाराला कुलूप नाही.
जांभूळ उद्योगातून रोजगार उपलब्ध करा
आलापल्ली : जिल्ह्यातील जांभूळ फळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. जांभूळ हे फळ अनेकजण खरेदी करतात. जांभळावर प्रक्रिया उद्योग व उत्पादन वाढीसाठी कमतरता आहे. जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने कोरची येथे जांभूळ प्रक्रिया उद्योग सुरू करावे.
सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधा
कुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी-सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अरततोंडी ते सती नदीघाट हे अंतर जवळपास दोन किमी आहे.