गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. यामध्ये चार ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. यांच्या मतदार संघामध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला कुठेही बहुमत मिळालेले नाही. भाजपच्या झंझावतात काँग्रेस आमदारांच्या मतदार संघातही कमळ बहरले. १0 वर्षापासून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणार्या आमदार आनंदराव गेडाम यांच्या मतदार संघात काँग्रेसला ४२ हजार ६७७ मताचा फटका बसला आहे. डॉ. उसेंडी प्रतिनिधीत्व करीत असलेल्या गडचिरोली क्षेत्रात ६९ हजार ९, रामरतन राऊत प्रतिनिधीत्व करीत असलेल्या आमगाव निर्वाचन क्षेत्रात २६ हजार ६२, माजी राज्यमंत्री आमदार विजय वडेट्टीवार प्रतिनिधीत्व करीत असलेल्या या क्षेत्रामध्ये २५ हजार ५२ मतांचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसला. गडचिरोली जिल्ह्याचा विचार करता दोन काँग्रेस आमदारांच्या निर्वाचन क्षेत्रात पक्षाला बसलेला फटका यामागचे प्रमुख कारण या भागात स्थानिक आमदाराप्रती असलेली नाराजी, राज्य सरकारची अँन्टी इनकंबन्शी, कार्यकर्त्यांपासून दुरावलेले लोकप्रतिनिधी व त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांऐवजी ठेकेदारांचा वाढता गोतावळा या सर्व बाबी पक्षासाठी हानीकारक ठरल्या. तसेच जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हसनअली गिलानी यांच्या प्रती असलेली सर्व मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी व आमदार उसेंडी यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गोतावळा जमू न देण्यात त्यांनी बजाविलेली भूमिका हे ही पराभवाचे एक प्रमुख कारण आहे. तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्रात पक्षाच्या नावावर गेले अनेक वर्ष काम करणार्या बड्या काँग्रेस नेत्याने पक्षाच्या विरोधात खुलेआम केलेला प्रचार हाही काँग्रेस पक्षाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला. मोदी लाट देशात असल्याने जिल्ह्यातही सर्व भागात ही लाट दिसून आली. याचा परिणाम पक्षाच्या पराभवात झाला. ओबीसी समाजाचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्याचे काम राज्य सरकारने केले नाही व आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनी या कामासाठी खास पाठपुरावा केला नाही. या सार्या नाराजींच्या बाबी काँग्रेस उमेदवार डॉ. उसेंडी यांच्यासाठी कारणीभूत ठरल्या.
काँग्रेस आमदारांसाठी धोक्याची घंटा
By admin | Updated: May 17, 2014 00:13 IST