‘ई-पॉस’वरील अंगठा वाढविणार जिल्ह्यात कोरोनाचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 05:00 AM2021-05-01T05:00:00+5:302021-05-01T05:00:28+5:30
संचारबंदीमुळे अनेक नागरिकांच्या हातचे काम हिरावले गेले आहे. राेजगार बुडाल्याने त्यांना माेफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हाभराची धान्याची मागणी नाेंदवली गेली. त्यानुसार वाढीव धान्याला मंजुरीही मिळाली असून ते धान्य संबंधित रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दोन दिवसांत मोफत धान्य वाटपाला सुरुवात होऊ शकते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाच्या संकटात कमी उत्पन्न गटातील रेशनकार्डधारकांना एक महिन्याचे माेफत धान्य दिले जाणार आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ई-पॉस मशीनवर लावणारा जाणारा अंगठा न घेता धान्य वाटप करण्याबाबत सरकारने अजून कोणतीही सूचना दिलेली नाही. अशा स्थितीत ई-पॉसवरील बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप कोरोना पसरण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संचारबंदीमुळे अनेक नागरिकांच्या हातचे काम हिरावले गेले आहे. राेजगार बुडाल्याने त्यांना माेफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हाभराची धान्याची मागणी नाेंदवली गेली. त्यानुसार वाढीव धान्याला मंजुरीही मिळाली असून ते धान्य संबंधित रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दोन दिवसांत मोफत धान्य वाटपाला सुरुवात होऊ शकते.
राज्य सरकारप्रमाणेच केंद्र सरकारनेही माेफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीही अशाच पद्धतीने लॉकडाऊनच्या काळात मोफत धान्य वापट करण्यात आले होते. त्यावेळी कोरोनाचा धोका टाळण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने न करता साध्या पद्धतीने नोंदी ठेवून धान्य वाटप झाले.
सॅनिटायझर, मास्क बंधनकारकच
रेशन दुकानावर धान्य घेण्यासाठी जाताना ग्राहकांना गर्दी न करता शारीरिक अंतर कायम ठेवावे लागणार आहे.
मास्क किंवा रूमालाने नाक-ताेंड झाकूनच ठेवावे लागणार आहे. अन्यथा इतरांचा जीव धाेक्यता येईल.
पाॅस मशीनवर प्रत्येक ग्राहकाऐवजी दुकानदराचेच थम्ब ग्राह्य धरले जाण्याची शक्यता आहे. अशावेळी सॅनिटायझरचा वापर करावा लागेल.
दुकानदार म्हणतात आम्हाला विमा संरक्षण द्या
कोरोना सध्या अत्युच्च पातळीवर असताना रेशनचे धान्य पॉस मशीनच्या माध्यमातून वाटप करण्याची जोखीम पत्करणे रेशन दुकानदारांना चुकीचे वाटते. यात लाभार्थ्यांसह आमचाही जीव धोक्यात येऊ शकतो, असे या दुकानदारांचे म्हणणे आहे.
पाॅस मशीनने धान्य वाटप करण्याऐवजी गेल्या तीन महिन्यात ज्यांनी धान्य उचलले त्यांना ऑफलाईन पध्दतीने कार्डवर नाेंदणी करून धान्य वाटप करण्याची मुभा द्यावी, अशीही रेशन दुकानदारांची मागणी हाेती. परंतु सरकारकडून ती मान्य करण्यात आलेली नाही.
लाभार्थ्यांचा जीव धोक्यात
रेशनचे धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांपैकी कोणी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास पॉस मशीनच्या माध्यमातून त्याची लागण इतरांना होऊ शकते. याशिवाय धान्यासाठी रांग लागल्यानंतर योग्य खबरदारी आणि शारीरिक अंतराचे नियम न पाळल्यास रांगेतील इतर व्यक्तींमध्ये कोरोना पसरण्याची शक्यता असते.
शासनाच्या निर्देशानुसार पॉस मशीनच्या माध्यमातूनच धान्य वाटप केले जाईल. कोरोनाची परिस्थिती पाहता यात थोडा धोका असल्याने दुकानदारांचा त्याला विरोध आहे, पण जसे निर्देश असतील त्याप्रमाणेच होईल.
-नरेंद्र भागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी