आष्टी : इल्लूर येथे गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याचा हैदोस सुरु आहे. गुरुवार व शुक्रवारला पेपरमिलच्या मागच्या बाजूने असलेल्या भिंतींवरून बिबट पहाटे ५ वाजता गावात शिरून कपिल बामणकर व प्रवीण बंडू बामणकर यांच्या मालकीच्या दाेन शेळ्या ठार केल्या.
मागील दाेन महिन्यांपासून आष्टी परिसरातील गावांमध्ये बिबट्याने उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या सुमारास चक्क गावात येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. गुरूवारी व शुक्रवारी बिबट्याने गावात प्रवेश केला. कपिल बामणकर व प्रवीण बंडू बामणकर यांच्या शेळ्यांच्या गाेठ्यात प्रवेश करून दाेन शेळ्या ठार केल्या. याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिल्यानंतर क्षेत्र सहायक ठाकरे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.