२४ हजार २९३ शेतकऱ्यांना लाभ : उद्दिष्टाच्या केवळ ५६ टक्केच कर्जाचे वाटपगडचिरोली : २०१६-१७ या खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने २४ हजार २९३ शेतकऱ्यांना १०४ कोटी ६७ लाख रूपयांच्या कर्ज वितरित करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वितरणाच्या बाबतीत आघाडीवर असून या बँकेने ४६ कोटी ९५ लाख रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. शेतीचा खर्च लाखोंच्या घरात पोहोचला आहे. एवढे मोठे भांडवल प्रत्येक शेतकऱ्याकडे राहत नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्याला जमीन कसण्यासाठी सावकारापुढे हात पुढे करावे लागतात. सावकार ५० ते ६० टक्के व्याज आकारून कर्ज देते. सावकाराच्या पाशातून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना कर्ज वितरण करणे सक्तीचे केले आहे. दरवर्षी खरीप हंगामापूर्वी प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाबाबतचे उद्दिष्ट दिले जाते. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळता इतर बँका या उद्दिष्टाच्या जवळपास कधीच पोहोचत नाही. त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ४० ते ५० टक्के एवढेच कर्ज वितरित करतात. चालू खरीप हंगामात १८८ कोटी रूपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले होते. त्यापैकी २० आॅगस्टपर्यंत बँकांनी केवळ २४ हजार ९९३ शेतकऱ्यांना १०४ कोटी ६७ लाख रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या ५६ टक्के एवढेच उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी बँकांना आणखी ८३ कोटी रूपयांचे कर्ज वितरित करावे लागणार आहे. मात्र आता धान रोवणीची कामे संपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला पैशाची गरज राहिलेली नाही. परिणामी आणखी पीक कर्जाची मागणी होणार नाही. (नगर प्रतिनिधी)
१०५ कोटींचे पीक कर्ज वितरित
By admin | Updated: September 3, 2016 01:30 IST