गुढीपाडव्यापासून शेतकरी वर्ग नवीन वर्षाची सुरुवात करतात. आपल्या शेतात पिकलेल्या कडधान्यांना (वाल, पोपट, तूर, चणा, वटाणा आदी) एकत्रित करून बनविलेल्या घुगऱ्या (उसळ) खाण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे घरोघरी अशा घुगऱ्या शिजवल्या जातात.
गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा, तर ग्रामीण व शहरी भागातही आहे. सोबत आंब्याच्या पानांचे तोरण, आंबा व कडुलिंबाचा बार व गाठी टाकून तयार केलेल्या तिर्थात औषधी गुणधर्मही असतो. याचदिवशी काही शेतकरी आपल्या शेतात जाऊन शेतीची पूजा करून सांजोनीसुद्धा करतात. खऱ्याअर्थाने याच दिवसापासून खरीप हंगामाची तयारी सुरू होत असते.
सालगड्याचे वर्षही गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. याला मांडवस असेही ग्रामीण भागात म्हणतात. काही सालगडी खांदेपालट करत असतात. म्हणजे वाढीव सालासह दुसऱ्या शेतमालकाकडे जातात. जनावरे राखण करणारा व गुराखी ठेवण्याची परंपरा गुढीपाडव्यापासून होते. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने यादिवशी एखादी वस्तू खरेदी करण्याकडेही अनेकांचा कल असतो.