चामोर्शी : भारत संचार निगम लिमिटेडची सेवा शहरापासून गावापर्यंत पोहोचली असली तरी मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक टॉवर बीएसएनएलचे आहेत. प्रत्येक तालुक्यात पाच ते सहा टॉवर असल्याने नागरिकांनी बीएसएनएलचे सीम घेतले आहेत. मात्र बहुतांश टॉवरमधील बॅटऱ्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होताच टॉवरचे काम करणे बंद होते. त्यामुळे या कालावधीत परिसरातील मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवितात. गडचिरोली जिल्ह्यात विद्युत खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचा फटका मोबाईलधारकांना बसत आहे. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. त्यामुळे बऱ्याचवेळा लाईन व्यस्त असल्याचे सांगितले जाते. केंद्र शासनाने दुर्गम भागात २६ टॉवर उभारण्याला परवानगी दिली होती. मात्र सदर टॉवरचे कामही पूर्ण झाले नाही. टॉवरच्या देखभालीकडे बीएसएनएल कर्मचाऱ्यांची दुर्लक्ष होत असल्याने टॉवर व्यवस्थित काम करीत नाही. तालुक्यातील नागरिकांनी अनेकवेळा बीएसएनएलकडे टॉवरबाबत तक्रार केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले असल्याने कव्हरेजची समस्या बहुतांश गावांमध्ये कायम आहे. (शहर प्रतिनिधी)
बीएसएनएलची सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी
By admin | Updated: January 24, 2015 00:52 IST