लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड हे तालुका मुख्यालयाचे गाव पुराच्या पाण्यामुळे जलमय झाले आहे. सततच्या पावसामुळे दुथडी भरून वाहात असलेल्या पर्लकोटा नदीला गेल्या १५ दिवसांत तिसऱ्यांदा पूर येऊन पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरले. बुधवारी सकाळपासून गावाच्या दिशेने पुढे सरकत असलेल्या पुराच्या पाण्याने गुरूवारी सकाळी १५० पेक्षा जास्त घरे व दुकानांना वेढा दिला. याशिवाय २०० कुुटुंबियांच्या वस्तीकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेल्याने हाह:कार उडाला आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्परता दाखवत जवळपास ३०० कुटुंबियांना उंच भागातील घरे, तहसील कार्यालयाचे सभागृह आणि गावातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात हलवून गरजेनुसार त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली आहे. पाणी कमी होण्याच्या आशेने घरातच थांबून अडकून पडलेल्या अनेक लोकांसह त्यांच्या घरातील साहित्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोट व डोंग्याने पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.गावातील गरोदर महिलांना आधीच हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात आणि ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याशिवाय भामरागडमध्येही पुरेसा औषधीसाठा असून तालुका आरोग्य अधिकाºयासह सर्व चमू गावातच आहे. तहसीलदार कैलास अंडील गडचिरोलीत गेल्यानंतर पूर चढल्याने ते भामरागडमध्ये पोहोचू शकले नाही. परंतू सर्व परिस्थितीवर नजर ठेवून ते सर्वांना सूचना करत आहेत.गावात नायब तहसीलदार निखिल सोनवाने, हेमंत कोकोडे तसेच नव्याने रुजू झालेले एसडीपीओ डॉ.कुणाल सोनवाने, मावळते एसडीपीओ तानाजी बरडे, ठाणेदार संदीप बांड, उपनिरीक्षक सुसतकर आणि रिस्क टिमचे कर्मचारी परिस्थिती हाताळत आहेत.कमलापूर : अहेरी मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या कमलापूर परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. मागील दहा दिवसांपासून काही गावांच संपर्क तुटला आहे. मात्र आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना कमलापूर किंवा जवळपासच्या मोठ्या गावांमध्ये जावे लागत आहे. पुलावरून पाणी वाहत असताना मार्ग काढावा लागत आहे.तालुक्यात सर्व शाळांना सुटीभामरागडप्रमाणे इतर अनेक गावांचा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार कैलास अंडील यांनी दिली. नागरिकांच्या मदतीसाठी महसूल विभागासह शिक्षकांची आणि नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. संपर्कासाठी मोबाईल नेटवर्क आणि वीज पुरवठा सुरू राहण्याकडेही प्रशासनाचे कटाक्षाने लक्ष आले.सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण इंद्रावती नदीची पाणीपातळी वाढल्यास परिस्थिती बिघडू शकते. गरज पडल्यास एनडीआरएफची टीम बोलविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन घेईल. पोलीस आणि महसूल विभागाकडे असलेल्या सॅटेलाईट फोनने संपर्क ठेवून योग्य त्या सूचना केल्या जात आहेत. पूरग्रस्तांची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी विविध विभागांचे जवळपास १०० कर्मचारी कार्यरत आहेत.- कैलास अंडील, तहसीलदार, भामरागडइंद्रवतीने ओलांडली धोक्याची पातळी२४ तासात भामरागडमध्ये १२० मिमी पाऊस झाला आहे. तीन नद्यांच्या संगमावर वसलेल्या भामरागडला यावेळी छत्तीसगडकडून येणाऱ्या इंद्रावती नदीच्या पुरामुळे मोठा फटका बसला आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीच्या प्रवाहामुळे पर्लकोटा नदीचे पाणी संगमावर अडल्या जाऊन ते पाणी गावात शिरले आहे.
पुराच्या पाण्याने भामरागड जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:17 IST
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड हे तालुका मुख्यालयाचे गाव पुराच्या पाण्यामुळे जलमय झाले आहे. सततच्या पावसामुळे दुथडी भरून वाहात असलेल्या पर्लकोटा नदीला गेल्या १५ दिवसांत तिसऱ्यांदा पूर येऊन पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरले.
पुराच्या पाण्याने भामरागड जलमय
ठळक मुद्देपर्लकोटा नदीचे पाणी शिरले गावात३०० कुटुुंबीयांना सुरक्षितस्थळी हलविलेछत्तीसगडमधील अतिवृष्टीने बिघडली स्थिती