धानाेरा : देश सुखी, समृद्ध हाेण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर सुजलाम सुफलाम हाेणे आवश्यक आहे. केंद्र शासन त्यासाठी पावले उचलत असून नवनवीन योजना अंमलात आणत आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास योजना अंमलात आणली व त्याद्वारे युवक-युवतींना विविध प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने दिल्या जाणाऱ्या कौशल्य विकास योजनेतून महिलांनी लघू उद्योग उभारून स्वतः व आपल्या कुटुंबाला आत्मनिर्भर करावे, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले. काैशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा प्रसिद्धी प्रशिक्षण केंद्र धानोराच्या संयुक्त विद्यमाने धानोरा येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना निःशुल्क प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानोराच्या माजी नगराध्यक्ष लीना साळवे होत्या. यावेळी आयुक्त प्रवीण खंडारे, भाजप किसान माेर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, ज्येष्ठ नेते साईनाथ साळवे, महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष तारा कोटांगले, शंभूविधी गेडाम, गडचिरोलीच्या नगरसेविका रंजना गेडाम उपस्थित होत्या.