अहेरी : जगात हिंदू धर्माच्या तत्वाला श्रेष्ठ मानल्या जाते. हिंदू धर्माचा संपूर्ण जगात आदर केला जातो त्यामुळे हिंदू असल्याचा अभिमान बाळगून धर्म रक्षणासाठी एकत्र या, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली येथील केंद्रीय महामंत्री विनायक देशपांडे यांनी केले. अहेरी येथील राजे विश्वेश्वराव महाराज स्टेडिीामवर आयोजित हिंदु धर्म संमेलनात ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून रामग्यानी महाराज होते तर प्रमुख अतिथी म्हणून शंकर महाराज, सतीश दलाल, निष्ठुरवार महाराज, रामदास महाराज, दादुजी महाराज, निळकंठ पुष्पालवार, देवेश मिश्रा आदी उपस्थित होते. यावेळी संमेलनाला मार्गदर्शन करताना रामग्यानी महाराज यांनी भारतीय संस्कृती जगात सर्वोत्तम आहे. त्यात आचार-विचार, खान-पान, आन-मान यांच्यात पवित्रता असणे गरजेचे आहे. हिंदु धर्मात गाय ही तिन मातांपैकी एक आहे. तिचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य आहे आणि यासाठी गोहत्या बंदी झालीच पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. संमेलनानिमित्य आलापल्ली ते अहेरीदरम्यान मोटारसायकल रॅली काढण्यात आली व कलश यात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाच्या दरम्यान गिरीश मद्देर्लावार यांनी सेंद्रिय शेतीची माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन दिनेश ठिकरे व पूर्वा दोंतुलवार यानी केले. प्रास्ताविक अमित बेझलवार यानी केले तर आभार अमोल मुक्कावार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता भारतमातेच्या आरतीने करण्यात आली. यावेळी शेकडोच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हिंदू असल्याचा अभिमान बाळगा
By admin | Updated: January 4, 2015 23:11 IST