आसरअल्ली : सिरोंचा तालुका मुख्यालयापासून आसरअल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वरील अंकिसानजीकच्या येर्रावागू नाल्यावरील पूल गेल्या दोन वर्षांपासून तुटलेला आहे. परिणामी अतिवृष्टीमुळे या परिसरातील तब्बल ५० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासन केवळ थातूरमातूर दुरूस्ती करून ग्रामस्थांची बोळवण करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. येर्रावागू नाल्यावर तत्काळ नव्याने पक्क्या स्वरूपाचा पूल उभारण्यात यावा या मागणीसाठी आसरअल्लीवासीय एकवटले आहेत.या नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी आसरअल्ली वासीयांनी लेखी निवदेनाद्वारे प्रशासनास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, अंकिसानजीकच्या येर्रावागू नाल्याच्या तात्पुरत्या दुरूस्तीसाठी ७ लाख रूपये खर्च करण्यात आले. मात्र सदर दुरूस्तीच्या कामात निकृष्ठ साहित्याचा वापर संबंधीत कंत्राटदाराने केल्यामुळे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सदर पूल पूर्णत: खचला आहे. यामुळे अंकिसा परिसरातील जवळपास ५० गावांचा संपर्क सिरोंचा तालुका मुख्यालयाशी तुटलेला आहे. अंकिसा परिसरातील नागरिकांना तालुका व जिल्हा मुख्यालयस्थळी ये-जा करण्यासाठी दूसरा पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाने तत्काळ येर्रावागू नाल्यावर पूल उभारावा, अशी मागणी आसरअल्लीवासीयांनी केली आहे. तहसीलदाराला निवेदन देताना धर्मराजू किष्टया वडलाकोंडा, गजानन कलाक्षपवार, सुधाकर मिसरी, सरपंच लक्ष्मण सिडाम, राजू जैनवार, भाष्कर गुडिमेटला, संजय मारगोनी, समय्या तोटकरी आदी हजर होते. (वार्ताहर)
नाल्यावर पूल बांधकामासाठी आसरअल्लीवासीय एकवटले
By admin | Updated: September 9, 2014 23:28 IST