गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी निर्माण झालेल्या गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली असले तरी परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम चंद्रपूर येथून चालविले जात असल्यामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाचे प्राध्यापक सध्या या प्रकारामुळे संतप्त आहेत. गडचिरोली या मागास जिल्ह्याला कमी लेखण्याचा हा प्रकार विद्यापीठ प्रशासनाकडून केला जात असल्याच्या बाबीवर अनेक प्राध्यापकांनी तीव्र आक्षेप नोंदविले आहे.२ आॅक्टोबर २०११ ला राज्य सरकारने चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठांतर्गत दोन जिल्ह्यात २३५ वर महाविद्यालये आहेत. यात १८० च्या आसपास महाविद्यालय हे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. गोंडवाना विद्यापीठामार्फत चार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. उन्हाळी व हिवाळी परीक्षा गोंडवाना विद्यापीठ गेल्या तीन-चार वर्षांपासून घेत आहेत. गतवर्षी या परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे केंद्र बोदलीस्थित नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयात ठेवण्यात आले होते. जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातूनही उत्तरपत्रिका तपासण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक येथे येत होते. मात्र यावर्षी गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने ६५ टक्के उत्तरपत्रिका तपासण्याचे काम चंद्रपुरात हलविले आहे. राज्यात अनेक लहान, मोठ्या विद्यापीठांमध्ये उत्तरपत्रिका तपासण्याचे काम विद्यापीठ ज्या ठिकाणी आहे, त्याच मुख्यालयाच्या जिल्ह्यात केले जाते. यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात असताना सिरोंचा येथून प्राध्यापक नागपूरला पेपर तपासण्यासाठी कामासाठी जात होते. मग चंद्रपूरच्या प्राध्यापकांना गडचिरोलीला येण्यास अडचण काय, असा प्रश्न सध्या प्राध्यापक विद्यापीठ प्रशासनाला विचारत आहे. गडचिरोली शहरात व्यवस्था नाही, या सबबीखाली हा प्रकार सुरू असल्याने विद्यापीठाविषयी प्राध्यापकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ गडचिरोलीची अहवेलना थांबवावी, अशी मागणीही प्राध्यापक करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
मूल्यांकन केंद्र चंद्रपुरात हलविण्यावरून नाराजी
By admin | Updated: April 18, 2015 01:31 IST