प्रमोद येरावारलोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बोअरवेलचं पाणी हवं तर हँडपंप मारावाच लागेल. हँडपंप न मारता बोअरवेलमधून सतत ३० वर्षे पाण्याचा प्रवाह सुरू आहे, असं कुणी सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. नव्यानं घोषित झालेल्या कन्हारगाव अभयारण्यात अशा दोन बोअरवेल आहेत की, ज्यांतून २४ तास पाण्याचा प्रवाह सुरू असतो. मागील तीस वर्षांपासून ही बोअरवेल गावकरी, वनमजूर आणि वन्यजिवांची तहान भागवीत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव हे घनदाट जंगलाने वेढलेलं गाव. वन्यजिवांचा इथे मोठा आवास आहे. नुकतेच या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. याच अभयारण्यात दोन बोअरवेल अशा आहेत की, ज्यांतून २४ तास पाण्याचा प्रवाह सुरू असतो. गावकरी व इथे येणाऱ्या वनमजुरांची तहान मागील ३० वर्षांपासून ही बोअरवेल भागवीत आहे. सतत सुरू असलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा वापर आता वनविभागाने वन्यजिवांची तृष्णा भागविण्यासाठी केला आहे. वनतळ्यात या बोअरवेलचं पाणी सोडले जात आहे. अभयारण्यातील वाघ, तृष्णभक्षक प्राणी या पाण्याने तृष्णा भागवितात. तसे कन्हारगाव हे खडकाळ जमिनीचा भूभाग. अशा भागात पाण्याचे स्रोत फार कमी असतात. मात्र कन्हारगाव याला अपवाद ठरले आहे. ३० वर्षांपूर्वी ही बोअरवेल खोदली गेली. गावातील वृद्ध सांगतात की, त्यावेळी या बोअरवेलच्या पाण्याचे फवारे २० ते २५ फूट उंच जात असत. आज बोअरवेलच्या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. मात्र मानवासोबतच वन्यजिवांची तृष्णा ही बोअरवेल भागवीत आहे.
ब्रिटिश शिकारी कन्हारगाव गाठायचेअतिशय घनदाट अरण्य असलेले कन्हारगाव वनक्षेत्र ब्रिटिशकाळात शुटिंग ब्लाॅक म्हणून ओळखले जायचे. ब्रिटिश इथे शिकार करण्यासाठी यायचे. ब्रिटिशांनी इथे बांधलेले गेस्ट हाऊस आजही सुस्थितीत आहे. अनेकजण आजही येथे भेट देतात.