लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कोरोना काळातील वीजबिल माफ करावे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने कुरखेडा येथे धरणे आंदाेलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. कोरोना काळातील दोनशे युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करणे, कृषी पंपाना वीजबिलातून मुक्त करावे, गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला गोंडवाना नाव देणे, अमरावती वैद्यकीय महाविद्यालयाला निधी उपलब्ध करून देत काम सुरू करावे तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे आदी मागण्यांकरिता सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, उपजिल्हाप्रमुख घिसू खुणे, तालुका समन्वयक भागचंद टहलानी, शहरप्रमुख मुक्ताजी दुर्गे, युवा आघाडीप्रमुख ग्यानचंद सहारे, तालुका सचिव रामचंद्र रोकडे, अशोक उसेंडी, चंद्रकला कोल्हे, प्रीतम धुपजारे, राजीराम पात्रीकर, तुलाराम कवडो, अनमोल बनकर, सकुनसिंग सोनजाल, किशनलाल सहाळा, केवळराम मरस्कोल्हे, सेवाराम ठेला, ठाकूरराम कोसरे, चिंतामन सहाळा, शंकर आकरे, पांडुरंग खरवडे, हेमंत मडकाम, जोगेंद्र धुपजारे, लता सहारे आदी उपस्थित होते.