ए. आर. खान - अहेरीसर्वसामान्य नागरिकांसाठी बस वाहतूक सेवा सोयीची असल्यामुळे अनेक नागरिक बससेवेचा आधार घेतात. मात्र पुरेशा चालक-वाहकाअभावी सध्या महामंडळाच्या अहेरी आगाराच्या बस वाहतुकीवर परिणाम होत आहे. अहेरी आगारात १५५ चालक व तेवढेच वाहक होते. २०१३-१४ या वर्षात अहेरी आगारातील १२९ बस वाहकांपैकी ७ वाहक निलंबित झाले. तर ५ वाहकांनी राजीनामे दिले. त्यामुळे आता ११७ वाहकांच्या भरवशावरच अहेरी आगाराच्या वाहतुकीचा डोलारा आहे. सध्य:स्थितीत महामंडळाच्या अहेरी आगारात ३८ वाहकांचा तुटवडा असल्याची माहिती पुढे आली आहे. एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी व मुलचेरा आदी तालुक्यातील प्रवाशांच्या वाहतुकीची जबाबदारी अहेरी आगारावर आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील तसेच लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांची जबाबदारी या आगारावर आहे. या आगारामार्फत सध्य:स्थितीत बसवाहतुकीचे ७६ शेड्यूल सोडल्या जातात. या आगारातून एकूण २८५ बसफेऱ्या सध्य:स्थितीत धावत आहेत. अहेरी आगारात सध्य:स्थितीत असलेल्या ७५ बसगाड्यांमध्ये ७३ बसेस जलद व अतिलांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या आहेत. मानव विकास मिशनच्या २९ स्कूल बसगाड्या व ३ निमआराम अतिजलद बसगाड्या आहेत. या आगारातील सर्व बसफेऱ्या चालविण्यासाठी वाहकांची कमतरता भासत आहे. त्यातल्या त्यात अर्ध्याअधिक बसगाड्यांची अवस्था बिकट आहे. आगार व्यवस्थापकाच्या गलथान कारभारामुळे अनेक बसेस प्रवासी वाहतुकीसाठी योग्य नाहीत. आगार व्यवस्थापकाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या उशीरा पोहोचतात. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अहेरी आगारात करण्यात आलेल्या नवीन बसेसचा पुरवठा अत्यंत नगण्य आहे. याचा सर्वाधिक फटका राज्य, आंतरराज्य मार्गावरील तसेच अतिदुर्गम भागातील प्रवाशांना बसत आहे. एकेकाळी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या अहेरी आगाराची वाटचाल शेवटच्या क्रमांकावर सुरू आहे. या आगाराच्या व्यवस्थेकडे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
अहेरी आगारात ३८ वाहकांचा तुटवडा
By admin | Updated: October 8, 2014 23:25 IST