लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.
गावाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. ही बाब शासनाच्या लक्षात आली असल्याने विविध योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जाते. गावाच्या विकासात ग्रामपंचायतींचे विशेष महत्त्व आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींचा कारभार कौलारू इमारतीतून चालवला जात होता. काळाच्या ओघात कौलारू इमारतीतून पावसाचे पाणी गळण्यास सुरुवात झाली. पावसाच्या पाण्यामुळे ग्रामपंचायतींमधील गावकऱ्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या इमारतींसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. काही इमारतींचे काम तर जवळपास अर्धे झाले आहे.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्राम पंचायतीच्या इमारती आता पक्क्या झाल्या आहेत. नागरिकांचे दस्तावेज आता ग्राम पंचायतीत सुरक्षित राहणार आहेत. २० लाख रूपयांचा निधी प्रत्येक ग्राम पंचायती इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या अंतर्गत काम सुरू आहे.
अहेरी तालुक्यात सर्वाधिक ग्राम पंचायती अहेरी हा विस्ताराने अतिशय मोठा तालुका आहे. मात्र या तालुक्यातील अनेक गावे आदिवासी बहुल व जंगलाने व्यापली आहेत. अनेक गावांना ग्राम पंचायतींच्या पक्क्या इमारती नव्हत्या. कौलारू इमारतीतून काम चालविले जात होते. मात्र ग्राम स्वराज्य योजनेतून केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे, हे विशेष
कामात गती येणार नवीन इमारतींमुळे प्रशासकीय कामाला गती येण्यास मदत होणार आहे. गावातील नागरिकांच्या दस्तऐवजाचे संरक्षण होणार आहे.
सचिवासाठी स्वतंत्र कक्ष नवीन इमारतीत ग्राम पंचायत अधिकाऱ्यासाठी (सचिव) स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. नवीन इमारतीत स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. स्वतंत्र पाणी सुविधा राहणार आहे. सरपंचासाठीसुद्धा स्वतंत्र कक्ष बांधण्यात आला आहे.
नवीन इमारती प्रशस्त नवीन इमारती आधुनिक पद्धतीने बांधल्या जात आहेत. त्यामुळे त्या मजबूत असण्याबरोबरच त्यात अनेक सुविधा आहेत. प्रशस्त असल्याने नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे.
या ठिकाणी नवीन इमारती गडचिरोली तालुक्यातील गिलगाव, मुरमाडी, देवापूर, खरपुंडी, नवरगाव, कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर, अहेरी तालुक्यातील आवलमारी, देचली, महागाव खुर्द, मांडरा, मरपल्ली, रेगूलवाही, तिमरम, वेलगूर, भामरागड तालुक्यातील मिरगुळवंचा, धानोर तालुक्यातील हेटी, कुथेगाव, दुधमाळा, देवसरा, सिरोंचा तालुक्यातील नरसिंहापल्ली, रंगयापल्ली, रामंजापूर व देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव, विहीरगाव या ठिकाणी इमारती मंजूर झाल्या आहेत.