आरमोरी : तालुक्यातील डोंगरतमाशी येथे शिळे अन्न खाल्ल्याने १० मुलांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. प्रकृती ढासळलेल्या १० मुलांना आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वच मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी येथे रविवारला भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमानिमित्त सार्वजनिक भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. गावकऱ्यांचे जेवन आटोपल्यानंतर उरलेले अन्न मंदिरात ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उरलेले शिळे अन्न गावातील लहान मुलांना देण्यात आले. सदर अन्न खाल्ल्यानंतर १० मुलांना उलट्याचा त्रास जाणवू लागला.विषबाधा झालेल्या १० मुलांमध्ये सोहम गजानन कांबळे (४), विपूर वामन तुमराम (५), तन्मय भावेश कांबळे (४), प्रशांत पोटनाके (१४), मंथन रामदास पेंदाम (६), निखिल विजय जुमनाके (७), साहिल विजय जुमनाके (१०), विवेक एकनाथ तुमराम (६), सानिया अशोक मडावी (९), किशोर माणिक मसराम (१६) सर्व रा. डोंगरतमाशी यांचा समावेश आहे. त्यानंतर गावातील नागरिकांनी प्रकृती ढासळलेल्या १० मुलांना सुरूवातीला वैरागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथून आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या सर्व मुलांवर रूग्णालयात उपचार सुरू असून सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पाच वर्षांपूर्वी वैरागडनजीकच्या लोहारा जि.प. शाळेतील मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाली होती. या प्रकरणी या शाळेच्या मुख्याध्यापकावर जि.प. प्रशासनाने कारवाई केली होती. (वार्ताहर)
१० मुलांना शिळ्या अन्नातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2015 02:44 IST