तगडी स्टारकास्ट अन् वेळ बदलूनही फायदा नाही झाला! 'ही' लोकप्रिय मालिका अवघ्या ७ महिन्यांत संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:09 IST2026-04-25T10:04:06+5:302026-04-25T10:09:17+5:30
टीआरपी गडगडला; अवघ्या ७ महिन्यात ही मालिका संपली, प्रेक्षक नाराज

तगडी स्टारकास्ट अन् वेळ बदलूनही फायदा नाही झाला! 'ही' लोकप्रिय मालिका अवघ्या ७ महिन्यांत संपली
Marathi Tv Serial Going off Air: मराठी टेलिव्हिजन जगतात मालिकांचं भवितव्य थेट टीआरपीवर ठरतं. लोकप्रियतेच्या शिखरावर झेपावलेल्या काही मालिकांनी वर्षानुवर्षं घराघरांत स्थान मिळवलं, तर काही मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतात. मालिकांमधील कथा आणि पात्रांशी प्रेक्षक जोडले जात असले, तरी कथानकातला कंटाळवाणा प्रवास किंवा वेळापत्रकातील बदल याचा थेट फटका टीआरपीला बसतो. त्यामुळेच आजकाल अनेक दैनंदिन मालिका काही महिन्यांतच बंद पडताना दिसत आहेत. अशीच एक मालिका, जी सुरुवातीच्या गाजावाजानंतर आता अल्पावधीतच बंद होणार आहे.
दरम्यान, या मालिकेचं नाव नशीबवान आहे. नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामुळे मालिका रसिक देखील नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय.अलिकडेच १४ सप्टेंबर २०२५ मध्ये नशीबवान या मल्टिस्टारर मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. अखेर ७ महिन्यानंतर ही लोकप्रिय मालिका आता निरोप घेणार आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे, नेहा नाईक, सोनाली खरे, अजय पूरकर असे तगडे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. सुरुवातीच्या काळात या मालिकेचा ९ वाजताचा प्राईम स्लॉट देऊनही प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ही मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जायची.
शेवटच्या भागात काय होणार?
अंतिम भागाच्या प्रोमोमध्ये खलनायक नागेश्वर घोरपडेचा दुर्दैवी अंत होतो असं दाखवण्यात येणार असल्याची झलक शेअर करण्यात आली आहे. यामुळे मालिकेचा शेवट निर्णायक आणि थरारक असणार असल्याचं संकेत मिळत आहेत. नागेश्वर हा भयंकर कट रचतो आणि गिरिजा तसेच तिच्या आईला घरात अडकवून संपूर्ण घराला आग लावतो. पण , शेवटच्या क्षणी रुद्रप्रताप तिथे योग्य वेळेवर पोहोचतो आणि आपल्या पत्नीला या संकटातून सुखरूपपणे बाहेर काढतो. सुरक्षित बाहेर आल्यावर गिरिजा अत्यंत हुशारीने नागेश्वर ला सांगते की , ज्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर त्याने तिच्या स्वाक्षऱ्या जबरदस्तीने घेतल्या होत्या , ते सर्व कागद आगीतच आत राहिले आहेत. हे ऐकताच संपत्तीच्या प्रचंड लालसेपोटी नागेश्वर पुन्हा त्या आगीत स्वतः उडी मारतो आणि इथेच या खलनायकाचा दुर्दैवी अंत होतो.