टीव्हीचा हिरो पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत! 'आनंदी' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:42 IST2026-05-07T16:41:08+5:302026-05-07T16:42:20+5:30
जवळपास तीन वर्षांनंतर विकासने स्टार प्रवाहच्या 'आनंदी' या मालिकेतून पुन्हा मालिका विश्वात पुनरागमन केलं आहे.

टीव्हीचा हिरो पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत! 'आनंदी' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री
अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडलेला लोकप्रिय अभिनेता विकास पाटीलने काही काळासाठी मालिका विश्वातून ब्रेक घेतला होता. जवळपास तीन वर्षांनंतर विकासने स्टार प्रवाहच्या 'आनंदी' या मालिकेतून पुन्हा मालिका विश्वात पुनरागमन केलं आहे. या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच विकास खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. विद्याधर निंबाळकर हे खलनायकाचं पात्र तो साकारणार आहे.
विद्याधर हा युगंधरचा लहान भाऊ आहे. युगंधरने स्वतः शाळेत न जाता मोल मजुरी करून विद्याधरला शिकवलं. पण विद्याधरने भावाच्या कष्टांची माती केली. युगंधरने कष्टाने कमावलेल्या संपत्तीवर त्याची नजर आहे. अतिशय उर्मट, असंवेदनशील, अय्याशी असलेल्या विद्याधरला पैशांचा प्रचंड माज आहे. बाई आणि बाटलीच्या नादापायी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. अश्या पद्धतीचं पात्र विकासने आजवर साकारलेलं नाही. त्यामुळे विद्याधर साकारणं विकाससाठी नवं आव्हान आहे.
या भूमिकेविषयी सांगताना विकास म्हणाला, "आजवर मी सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण ‘आनंदी’मधला विद्याधर पूर्णपणे वेगळा आहे. त्याची मानसिकता, त्याचा राग, त्याचा अहंकार सगळंच टोकाचं आहे. विद्याधरच्या नकारात्मकतेला वास्तववादी पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न करतोय. एक अभिनेता म्हणून स्वतःला नव्याने शोधण्याची संधी मिळते आहे". लवकरच मालिकेत आनंदी विवाहबंधनात अडकणार आहे. आनंदीचं लग्न होऊ नये म्हणून विद्याधर नेमकी कोणती खेळी खेळणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. तेव्हा न चुकता पहा आनंदी रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.