"मराठी येत नसेल तर शिका आणि शिकायचीच नसेल तर निघा…", अमराठी रिक्षा चालकांना मराठी गायकाचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:56 IST2026-04-23T16:55:21+5:302026-04-23T16:56:02+5:30
मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यासंबंधी अनेक रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली असून संपाचा इशारा दिला आहे. यावरुन अनेक मराठी सेलिब्रिटी त्यांचं मत व्यक्त करताना दिसत आहेत.

"मराठी येत नसेल तर शिका आणि शिकायचीच नसेल तर निघा…", अमराठी रिक्षा चालकांना मराठी गायकाचा थेट इशारा
येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यासंबंधी अनेक रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली असून संपाचा इशारा दिला आहे. यावरुन अनेक मराठी सेलिब्रिटी त्यांचं मत व्यक्त करताना दिसत आहेत. आता गायक आणि बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदेने पोस्ट शेअर केली आहे.
उत्कर्ष शिंदेने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. दादरमध्ये असलेल्या शिवसेना भवनाच्या परिसरातील हा फोटो आहे. हा फोटो शेअर करत उत्कर्षने स्पष्ट शब्दांत मराठीला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांची कानउघाडणी केली आहे. "मराठी येत नसेल तर शिका आणि शिकायचीच नसेल तर निघा…परप्रांतीय मित्रांनो तुमचा द्वेष नाही आम्हाला हा आमच्या मराठी भाषेसाठीचा, मानसन्मान, अभिमान आहे. तुम्हाला मराठीच कळत नाही किंवा कळून घ्याचीच नाही म्हटल्यावर मराठी अस्मिता काय कळणार..ठिक आहे तुम्हाला कळेल त्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न मराठी माणूस नक्की करेल", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
उत्कर्ष शिंदेच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. उत्कर्ष अनेकदा त्याच्या सोशल मीडियावरुन समाजातील घटनांवर भाष्य करत असतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सचिन गोस्वामी यांनीही याबाबत फेसबुक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की "रिक्षा चालकांना तीन महिन्याचा व्यवहारउपयोगी मराठी शिकवण्याचा ऑनलाइन क्लास शासनाने तयार करून कंपलसरी करावा..तीन महिन्यांनी ऑनलाइन परीक्षा घेवून.पास झालेल्याचा रिक्षा परवाना कायम ठेवून,नापासना उत्तीर्ण होई पर्यंत परवाना निलंबित करावा.. हीच पद्धत परभाषिक भाजी विक्रेते,रस्त्यावरील विक्रेते यांच्यात ही राबवता येईल. आपण नागरिकांनी सुद्धा व्यवहारात ठामपणे फक्त मराठीच बोलावे भाषा संवर्धना साठी हे आवश्यक आहे.. महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे".