समर-स्वानंदीच्या आयुष्यात 'तिची' एन्ट्री! ९ वर्षांनंतर झी मराठीवर परतली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री.
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 17:53 IST2026-04-29T17:52:23+5:302026-04-29T17:53:50+5:30
बऱ्याच वर्षांपूर्वी सुबोध भावेसोबत लोकप्रिय मालिकेत झळकलेली अभिनेत्री

समर-स्वानंदीच्या आयुष्यात 'तिची' एन्ट्री! ९ वर्षांनंतर झी मराठीवर परतली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री.
झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या लोकप्रिय मालिकेमध्ये सध्या समर आणि स्वानंदी यांच्या नात्यात प्रेमाचे रंग भरताना दिसत असतानाच, आता कथानकात एका नवीन पात्राच्या एन्ट्रीमुळे मोठी खळबळ उडणार आहे. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत असली, तरी त्यांच्या सुखाला आता मल्लिकाच्या कारस्थानांमुळे दृष्ट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समर आणि स्वानंदी हळूहळू एकमेकांच्या जवळ येत असतानाच मल्लिकाने एका नव्या खेळाची सुरुवात केली आहे.
मालिकेत आता 'किमया' नावाच्या एका पात्राची एन्ट्री होणार असून, ती समरची 'खास' जुनी मैत्रीण असल्याचे सांगितले जात आहे. मल्लिकाने या किमयाबद्दल स्वानंदीला सांगून तिच्या मनात संशयाचे बीज पेरले आहे, ज्यामुळे स्वानंदीची धाकधूक वाढली आहे. ही किमया लवकरच समरच्या घरी राहायला येणार असल्याने समर आणि स्वानंदीच्या बहरत असलेल्या नात्यात मिठाचा खडा पडणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
विशेष म्हणजे, किमया ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा गोखले साकारणार आहे. पूर्वा तब्बल ९ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर झी मराठी वाहिनीवर कमबॅक करत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यापूर्वी पूर्वाने 'स्वराज्यरक्षक संभाजी'मध्ये सईबाई भोसले यांची तर 'कुलवधू'मध्ये मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. आता एका वेगळ्या आणि ग्लॅमरस भूमिकेत ती प्रेक्षकांसमोर येणार आहे.

पूर्वा गोखले आणि सुबोध भावे यांची जोडी यापूर्वी 'कुलवधू' या गाजलेल्या मालिकेत एकत्र दिसली होती. अनेक वर्षांनंतर ही जुनी लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळत असतानाच, समरच्या आयुष्यातील या जुन्या मैत्रिणीमुळे स्वानंदीचे स्थान धोक्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूणच, 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचे कथानक आता एका रंजक वळणावर पोहोचले आहे. किमयाच्या येण्याने समर आणि स्वानंदीच्या नात्यात गैरसमज निर्माण होतात की त्यांचे नाते अधिक घट्ट होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रेम, कौटुंबिक मूल्ये आणि अनपेक्षित ट्वीस्ट यामुळे ही मालिका येणाऱ्या काळात अधिक रंजक होणार यात शंका नाही.