टीव्हीवरचा सर्वात महागडा अभिनेता! 'ती' एक चूक अन् काम मिळणं बंद झालं, आता ६ वर्षानंतर करतोय कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:01 IST2026-01-16T12:52:19+5:302026-01-16T13:01:37+5:30
'TV'वरचा शाहरुख खान, सेटवरील वर्तवणूक अन् जास्त मानधनाच्या मागणीमुळे अभिनेता घरी बसला, ६ वर्षांनी करतोय कमबॅक

टीव्हीवरचा सर्वात महागडा अभिनेता! 'ती' एक चूक अन् काम मिळणं बंद झालं, आता ६ वर्षानंतर करतोय कमबॅक
Television: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणजे करण पटेल(karan patel) 'ये है महोब्बतें' या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. या मालिकेत रमण भल्ला या भूमिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेनंतर अभिनेत्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. एकेकाळी या अभिनेत्याला टीव्हीवरचा शाहरुख खान म्हणून ओळखलं जायचं. मात्र, एकीकडे यशाच्या शिखरावर असताना करण पटेल अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला. त्यानंतर आता ६ वर्षांच्या ब्रेकनंतर तो
कमबॅक करतो आहे.
करण पटेल लवकरच रिअॅलिटी शो 'द-५०' च्या माध्यमातून तो टीव्हीवर परतणार आहे. रिअॅलिटी शो सगळ्यात मोठा शो असल्याचंही सांगण्यात येत आहे. या शोमध्ये अनेक टास्क असतील आणि स्पर्धक ५० दिवसांमध्ये आपली कौशल्ये दाखवून शो जिंकण्याचा प्रयत्न करतील. हा शो प्रसारित होण्याआधीच त्यातील काही स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.
करण पटेलची शोमध्ये एन्ट्री...
दरम्यान, 'द-५०' शोमध्ये करण पटेलला एन्ट्री मिळाली आहे. नुकतीच अभिनेत्याने आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. तो 'द ५०' या शोचा भाग होणार असल्याची पुष्टी केली आहे. बऱ्याच काळानंतर अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते देखील प्रचंड आनंदी झाले आहेत.
अभिनेत्याकडे नव्हतं काम...
काही महिन्यांपूर्वीच करण पटेलने भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यादरम्यान, अभिनेत्याने आपल्याकडे कोणतंही काम नसल्याची खंत व्यक्त केली होती. २०१९ ते २०२५ या सहा वर्षांच्या काळात त्याने कोणताही टीव्ही शो किंवा रिॲलिटी शो केला नाही, असं त्याने सांगितलं. अचानक मिळालेल्या स्टारडममुळे त्याच्यात अहंकार वाढला आणि त्याने अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सना नकार दिला.
वर्कफ्रंट
करण पटेलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. करण पटेल एकेकाळी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होता. त्याने 'ये है मोहब्बतें' या मालिकेसाठी प्रति एपिसोड सुमारे १.५ लाख रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते, परंतु नंतर त्याने 'कसौटी जिंदगी की २' साठी आपले मानधन वाढवून प्रति एपिसोड ३ लाख रुपये घ्यायचा, अशीही माहिती आहे.'कसम सें','कस्तुरी',' ये है महोब्बते'तसेच 'नच बलिए', 'झलक दिखला जा' यांसारख्या मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये तो झळकला आहे.