"प्रत्येक मराठी माणसाला..." अभिषेक बच्चनकडून रितेश देशमुखचं कौतुक, जिनिलियाला अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 09:45 IST2026-04-20T09:30:01+5:302026-04-20T09:45:45+5:30
'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेकने रितेशचं भरभरून कौतुक केलं.

"प्रत्येक मराठी माणसाला..." अभिषेक बच्चनकडून रितेश देशमुखचं कौतुक, जिनिलियाला अश्रू अनावर
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनचा शंभर दिवसांचा खेळ अखेर संपला आहे. तन्वी कोलते या सहाव्या पर्वाची विजेती ठरली आहे. यावर्षी टॉप-५ मध्ये तन्वीसह विशाल कोटीयन, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद असे दमदार स्पर्धक होते. पण, चाहत्यांची सर्वाधिक मतं मिळवत तन्वीने 'बिग बॉस मराठी'च्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेला बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री जिनिलिया देशमुख या दोघांनी हजेरी लावली होती. यावेळी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेकने रितेशचं भरभरून कौतुक केलं. आपल्या नवऱ्याचं कौतुक होताना पाहून जिनिलिया ही भावुक झाल्याचं दिसून आलं.
अभिषेक बच्चनने मंचावर रितेशच्या कामाचे कौतुक करताना सांगितले की, "मी आज तुम्हाला रितेशबद्दल काहीतरी सांगणार आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटासाठी रितेश गेल्या २०-२५ वर्षांपासून मेहनत घेत आहे. शूटिंगदरम्यान मी त्याला जे काही प्रश्न विचारले, त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे तयार होते. त्याने या विषयाचा इतका सखोल अभ्यास केला आहे की, पाहून थक्क व्हायला होतं. त्याच्यासाठी हा केवळ एक चित्रपट नाही, तर ती एक मोठी जबाबदारी आहे. रोज सकाळी आम्ही जेवाह सेटवर जायचो तेव्हा आधी पूजा व्हायची आणि तो म्हणायचा आपण जे करत आहोत, ते एका चित्रपटापेक्षा खूप मोठं आहे".
यावेळी अभिषेकने चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दलही मोठा खुलासा केला. तो म्हणाला, "रितेश मला माझ्या भावासारखा आहे. त्याने यापूर्वी बनवलेल्या चित्रपटांमध्ये मला काम मिळालं नव्हतं, पण 'राजा शिवाजी'च्या निमित्ताने त्याने मला छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू 'संभाजीराजे' यांच्या भूमिकेसाठी विचारलं. ही संधी माझ्यासाठी खूप मोठी आणि अभिमानाची होती".
शूटिंगचा अनुभव शेअर करताना अभिषेक भावुक झाला. तो म्हणाला, "जेव्हा रितेशने माझा पहिला शॉट 'ओके' केला, तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला की, माझा भाऊ आता खूप पुढे जाणार आहे. त्याने या सिनेमात खरंच कमाल काम केलं आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांचे डोळे नक्कीच पाणावतील आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल, याची मला खात्री आहे". अभिषेकच्या तोंडून आपल्या नवऱ्याचं कौतुक ऐकताना जिनिलियाच्या डोळ्यात पाणी आलं.