Then And Now : ‘रोजा’, ‘बॉम्बे’मधील गोड चेहऱ्याचा Arvind Swamy आठवतो? आता बघा कसा दिसतो...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 11:15 AM2022-11-17T11:15:06+5:302022-11-17T11:39:17+5:30

Roja And Bombay Fame Actor Arvind Swamy : 1992 साली ‘रोजा’ आणि 1995 साली ‘बॉम्बे’ या अरविंद स्वामीच्या चित्रपटांनी बॉलिवूडप्रेमींना वेड लावलं होतं. आता हा अरविंद स्वामी बराच बदलला आहे.

सध्या साऊथ स्टार्सची क्रेझ आहे. अल्लू अर्जुन, यश, राम चरण, विजय देवरकोंडा असे साऊथ स्टार्स चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. पण साऊथ स्टार्सबद्दलचं हे क्रेझ आजचं नाही तर 30 वर्ष जुनं आहे. होय, 30 वर्षांआधी एका गोड चेहऱ्याच्या साऊथ स्टारनं सगळ्यांना वेड लावलं होतं.

होय, आम्ही बोलतोय ते तामिळ सिनेमाचा स्टार अरविंद स्वामी याच्याबद्दल. 1992 साली ‘रोजा’ आणि 1995 साली ‘बॉम्बे’ या अरविंद स्वामीच्या चित्रपटांनी बॉलिवूडप्रेमींना वेड लावलं होतं. आता हा अरविंद स्वामी बराच बदलला आहे.

प्रसिद्धीसाठी काम न करणारा अभिनेता म्हणून अरविंद स्वामीला ओळखलं जातं. खरं तर अरविंद स्वामीला डॉक्टर व्हायचं होतं. कॉलेज करताना पॉकेटमनी हवा म्हणून अरविंद स्वामी मॉडेलिंग करू लागला आणि बघता बघता फिल्मी दुनियेचा स्टार झाला.

एकदिवस मणिरत्नम यांची नजर त्याच्यावर पडली आणि मणिरत्नम यांनी त्याला ‘थलपती’ या सिनेमासाठी त्याला साईन केला. हा सिनेमा ब्लॉकबस्टर झाला आणि अरविंद मणिरत्नम यांचा आवडता स्टार झाला.

‘थलपती’नंतर मणिरत्नम यांनी अरविंदला धडाधड आपल्या चित्रपटांसाठी साईन केलं. अरविंद ‘रोजा’मध्ये दिसला. या चित्रपटाने अरविंदला एका रात्रीत स्टार केलं. पुढे मणिरत्नम यांच्याच ‘बॉम्बे’ चित्रपटातही तो झळकला. हा सिनेमाही ब्लॉकबस्टर ठरला.

Minsara Kanavu या चित्रपटात तो काजोलसोबत झळकला. सात रंग के सपने या सिनेमात जुही चावलासोबत त्याची जोडी जमली. 2000 साली राजा को रानी से प्यार हो गया या चित्रपटात मनीषा कोईरालासोबत तो दिसला.

2005 मध्ये अरविंद स्वामीला एक भीषण अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. पायाला सौम्य लकवा मारला. यातून बरं होण्यासाठी अरविंदला 4-5 वर्षांचा कालावधी लागला. याकाळात त्याचं प्रचंड वजन वाढलं.

या काळात अरविंद स्वामी ग्लॅमरच्या दुनियेतून पुरता गायब झाला होता. पण मणिरत्नम यांनी त्याला पुन्हा खेचून आणला. ‘कडाल’ या तामिळ सिनेमासाठी मणिरत्नम यांनी अरविंदला साईन केलं. यासाठी अरविंदने 15 किलो वजन घटवलं. यानंतर अरविंद अनेक सिनेमांत झळकला.

गेल्यावर्षी कंगना राणौतच्या थलायवी या सिनेमात अरविंदने एम जी रामचंद्रन यांची भूमिका साकारली. सुमारे 25 वर्षानंतर त्याने मल्याळम सिनेमा ओट्टू मधून वापसी केली.

अरविंदने जून 1994 साली गायत्री राममूर्तीसोबत लग्नगाठ बांधली. दोघांना एक मुलगी व मुलगा अशी दोन मुलं झालीत. अर्थात 2010 मध्ये अरविंद व गायत्री यांचा घटस्फोट झाला. 2012 मध्ये अरविंदने अपर्णा मुखर्जीसोबत दुसरं लग्न केलं.