३० वर्ष रती अग्निहोत्रीने सहन केला पतीचा जाच; 'या' एका कारणामुळे होत्या गप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 01:50 PM2021-12-10T13:50:47+5:302021-12-10T14:03:58+5:30

Rati agnihotri: लग्नानंतर १९८६ मध्ये रती यांनी त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर रती यांनी कलाविश्वाला रामराम ठोकला. परंतु, कलाविश्वापासून दूर झालेल्या रती यांना पती अनिल यांनी त्रास देण्यास सुरुवात केली.

'एक दुजे के लिये' या चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात सुपरस्टार झालेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रती अग्निहोत्री. वयाच्या १७ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रती यांनी शौकिन, स्वामी दादा, फर्ज और कानून यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

वयाच्या १० व्या वर्षापासून मॉडलिंग करणाऱ्या रती यांनी कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर सलग तीन वर्ष त्यांच्याकडे चित्रपटांची रांग होती. केवळ तीन वर्षांत त्यांनी ३२ दाक्षिणात्य चित्रपट केले.

1981 साली रतीचा ‘एक दुजे के लिये’ हा सिनेमा रिलीज झाला आणि रती एका रात्रीत स्टार झाली. याचदरम्यान रतीची ओळख बिझनेसमॅन अनिल विरवानीसोबत झाली. रती आणि अनिल यांच्या लग्नाला कुटुंबाकडून विरोध होता. मात्र, तरीदेखील कुटुंबाचा विरोध झुगारून त्यांनी ९ फेब्रुवारी १९८५ मध्ये लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर १९८६ मध्ये रती यांनी त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर रती यांनी कलाविश्वाला रामराम ठोकला. परंतु, कलाविश्वापासून दूर झालेल्या रती यांना पती अनिल यांनी त्रास देण्यास सुरुवात केली.

लग्नानंतर 30 वर्षे रती चित्रपटांपासून दूर राहिली. याकाळात त्यांना नवऱ्याकडून शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. परंतु, या त्रास असह्य झाल्यामुळे त्यांनी पोलिस स्टेशन गाठलं आणि लग्नानंतर ३० वर्षांनी त्या पुन्हा चर्चेत आल्या. यावेळी त्यांनी अनिलविरोधात तक्रार दाखल केली होती.

पतीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर रती यांनी एका मुलाखतीत त्यांच्यावर झालेले अन्य व इतकी वर्ष सगळं सहन करण्यामागचं कारण सांगितलं.

"३० वर्ष मी पतीकडून होणारा त्रास सहन केला. हा त्रास मी केवळ माझ्या मुलासाठी सहन करत होते. माझ्या मुलावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ नये यासाठीच मी गप्प होते. परंतु, ज्यावेळी माझ्या मुलाला सगळं कळू लागलं त्यावेळी मी पतीविरोधात तक्रार करायचं पाऊल उचललं", असं रती म्हणाल्या.

दरम्यान, 2015 मध्ये रती यांनी पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आणि यानंतर दोघांचे नाते संपुष्टात आले. सध्या रती आपल्या मुलासोबत राहते. 2001 मध्ये रती यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक केले.

'कुछ खट्टी कुछ मीठी' या चित्रपटात काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका त्यांनी साकारली होती.