Oscar RRR Movie : 850 चित्रपट अन् 3600 गाणी; अशी आहे Oscar मिळवणाऱ्या 'नाटू-नाटू'च्या गीतकाराची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 04:11 PM2023-03-14T16:11:21+5:302023-03-14T16:16:38+5:30

Oscar RRR Movie : गीतकार चंद्रबोस यांनी तब्बल 850 चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. जाणून घ्या त्यांचा प्रवास...

Oscar RRR Movie : गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ गाण्याला यंदाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हे गाणे तेलुगू चित्रपटसृष्टीतील मोठे नाव असलेल्या चंद्रबोस यांनी लिहिले आहे. गेल्या 25 वर्षांपासून चित्रपटांसाठी गाणे लिहिणाऱ्या चंद्रबोस यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. त्यांच्या इतकी गाणी बॉलिवूडमधील कोणत्याही गीतकाराने लिहिली नाहीत.

चंद्र बोस यांचे संपूर्ण नाव कनुकुंतला सुभाष चंद्रबोस असे आहे. त्यांनी आपल्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये तब्बल 850 चित्रपटांसाठी सुमारे 3600 गाणी लिहिली आहेत. त्यांनी आपल्या गाण्यांसाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आपल्या नावे केली आहेत. यात अकादमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कारांचा समावेश आहे.

चंद्रबोस यांचा जन्म आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यातील चालगरीगा गावात एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. ते सुभाषचंद्र बोस यांच्यावर खूप प्रभावित होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाचे नाव कनुकुंतल सुभाषचंद्र बोस ठेवले. गावातून हायस्कूलचे शिक्षण घेतल्यानंतर चंद्रबोस यांनी हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतली.

त्यांना सुरुवातीपासूनच संगीताची आवड होती, त्यामुळए इंजिनीअरिंग झाल्यानंतर त्यांनी गायनात करिअरला सुरुवात केली. काही काळ हैदराबाद दूरदर्शनशी जोडले गेले. इथे विशेष यश मिळालं नाही, तेव्हा गाणं गायणं सोडलं आणि गीतकार झाले. त्यांनी तेव्हा गाणी लिहिण्यास सुरुवात केली.

त्यांनी 1995 मध्ये तेलुगू चित्रपट "ताजमहाल" साठी पहिले गाणे लिहिले. यामध्ये त्यांना संगीत दिग्दर्शक एमएमएसरीलेखा यांनी मदत केली. त्यांनीच चंद्रबोस हे नवीन स्क्रीन नाव दिले. त्यानंतर चंद्रबोस यांनी मागे वळून पाहिले नाही. चंद्रबोस यांनी तेलगू फिल्म इंडस्ट्रीमधील कोरिओग्राफर सुचित्रासोबत लग्न केले.

"नाटू-नाटू" गाण्यासाठी चंद्रबोस यांना विचारणा झाली तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक आर. राजामौली यांनी चित्रपटाचे संगीतकार एम. किरवाणी यांना सांगितले होते की, त्यांना एक क्लासिक गाणे हवे आहे, जे लोकांना नाचायला भाग पाडेल.

यामध्ये इतिहास असावा आणि याच्या संगीतात लोकांना बांधून ठेवण्याची ताकद असावी. यानंतर किरवाणी यांनी चंद्रबोसची निवड केली. 17 जानेवारी 2020 पासून या गाण्यावर काम सुरू झाले आणि अखेर या आयकॉनिक गाण्याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.