सुरक्षित सरकारी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात आले हे दिग्गज स्टार... पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 01:05 PM2021-09-08T13:05:01+5:302021-09-08T13:14:59+5:30

होय, सुरक्षित सरकारी नोकरीला लाथ मारून चित्रपट क्षेत्रात नशीब आजमावणारे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आहेत. आज त्यावरच एक नजर...

जानी.. हा शब्द ऐकताच एकच चेहरा डोळ्यांपुढं येतो. तो म्हणजे, दिग्गज अभिनेते राजकुमार यांचा. कुलभूषणनाथ पंडित हे राजकुमार यांचं खरं नाव. राजबिंडा राजकुमार सिनेमात हिरो होण्याआधी मुंबई पोलिसांत सब-इन्स्पेक्टर होता. 1952 मध्ये त्यांनी पोलिसातली नोकरी सोडून अभिनयात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय राजकुमार यांना अपार लोकप्रियता मिळवून देणारा ठरला.

बॉलिवूडचा असाच एक दिग्गज अभिनेता म्हणजे देव आनंद. बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते म्हणून ओळखले गेलेले देवआनंद एकेकाळी सरकारी नोकरी करत होते. मुंबईच्या मिलिटरी सेन्सर बोर्डात ते क्लर्क होते. यासाठी त्यांना दरमहा 165 रूपये पगार मिळायचा. सैनिकांनी पाठवलेल्या चिठ्ठ्या त्यांच्या आईवडिलांना वाचून दाखवायचे काम ते करत.

मोगँबो म्हणजे अमरिश पुरी. खलनायकाच्या भुमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करणारे अमरिश पुरी वीमा कंपनीत क्लर्क होते. 21 वर्ष त्यांनी ही नोकरी केली आणि त्यानंतर त्यांना चित्रपटात संधी मिळाली. 1971 मध्ये त्यांनी रेशमा और शेरा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.

अमोल पालेकर हेही अभिनयक्षेत्रात येण्याआधी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होते. पदवी शिक्षणानंतर अमोल पालेकर यांनी ह्यबँक आॅफ इंडियाह्णमध्ये सुमारे आठ वर्षे नोकरी केली होती. सुरुवातीचे तीनही चित्रपट सिल्व्हर ज्युबिली हिट ठरल्यानंतर त्यांनी आपली बँकेतील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

11 नोव्हेंबर 1926 रोजी मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये जन्मलेल्या जॉनी वॉकर यांचे बालपणीचे नाव बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी होते. बालपणीच ते 10 भाऊ-बहिणींसोबत मुंबईला आले होते. मुंबईला आल्यावर त्यांनी बेस्ट बसमध्ये कंडक्टरची नाेकरी केली. लहानपणापासूनच लोकांची नकल करत सर्वांना हसवण्यात तरबेज होते. बसमध्येदेखील ते प्रवाशांना हसवत असत.

कुछ तो गडबड है दया..., हा डायलॉग आणि शिवाजी साटम हे जणू समीकरण बनलं आहे. टीव्हीवरच्या अफाट लोकप्रिय झालेल्या सीआयडी मालिकेतून वेगळी ओळख निर्माण करणारी शिवाजी साटम एका सरकारी बँकेत कॅशिअर होते. 1987 साली त्यांनी रिश्ते-नाते या मालिकेतून अभिनयात प्रवेश केला आणि सरकारी नोकरीचा राजीनामा दिला.

रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. रजनीकांत यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रजनीकांत यांनी बंगळुरू येथील एका ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यावेळी ते कन्नड रंगमंचावरही काम करू लागले. पुढे 1973 मध्ये ते मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटशी जोडले गेले.