शूटिंग बघण्यासाठी गेली अन् नशिब पालटलं, मराठमोळ्या अभिनेत्रीला ऑडिशनशिवाय मिळाली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:42 IST2026-04-20T14:53:01+5:302026-04-20T15:42:00+5:30
कधीकधी नशिबाचे चक्र असे काही फिरते की, तुम्हाला संधी शोधावी लागत नाही, तर संधीच तुमचा शोध घेत तुमच्यापर्यंत येते.

शूटिंग बघण्यासाठी गेली अन् नशिब पालटलं, मराठमोळ्या अभिनेत्रीला ऑडिशनशिवाय मिळाली भूमिका
चंदेरी दुनियेत स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी दररोज हजारो तरुण-तरुणी रात्रं-दिवस ऑडिशन्सच्या रांगेत उभे राहतात. कोणाला वर्षांनुवर्षांच्या संघर्षानंतर संधी मिळते, तर कोणाचे स्वप्न अपूर्णच राहते. पण कधीकधी नशिबाचे चक्र असे काही फिरते की, तुम्हाला संधी शोधावी लागत नाही, तर संधीच तुमचा शोध घेत तुमच्यापर्यंत येते. असंच काहीसं घडलं होतं मराठी सिनेसृष्टीची 'सदाबहार सुंदरी' वर्षा उसगांवकर यांच्या बाबतीत.
आज ज्यांना आपण एक दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखतो, त्या वर्षा उसगांवकर एकेकाळी केवळ एक कुतूहल म्हणून मालिकेचं शूटिंग पाहायला सेटवर गेल्या होत्या. कोणत्याही ऑडिशनची तयारी नाही, मनात अभिनेत्री बनण्याची त्या क्षणी कोणतीही ओढ नाही; तरीही नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच आखून ठेवलं होतं. सेटवर उभ्या असलेल्या एका साध्या प्रेक्षकामधून थेट 'महाभारत'सारख्या महाकाव्य मालिकेतील 'उत्तरा' या महत्त्वाच्या भूमिकेपर्यंतचा त्यांचा हा प्रवास आजही अनेकांना थक्क करणारा आहे.
'महाभारत' मालिका सुरू होऊन जवळपास एक वर्ष झाले होते. वर्षा उसगांवकर यांचे वडील त्यांना या मालिकेचा भाग होताना पाहू इच्छित होते, मात्र वर्षा यांनी स्वतः कधीही त्यासाठी प्रयत्न केला नव्हता. एकदा त्या आपल्या कुटुंबासोबत केवळ शूटिंग पाहण्यासाठी मालिकेच्या सेटवर गेल्या होत्या. त्याच काळात निर्माते 'उत्तरा'च्या भूमिकेसाठी एका नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. सेटवर उपस्थित असलेले अभिनेते गुफी पेंटल (ज्यांनी शकुनी मामाची भूमिका साकारली होती) यांची नजर वर्षा यांच्यावर पडली आणि त्यांनी जागीच वर्षा यांना ही भूमिका ऑफर केली. वर्षा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही संधी तात्काळ स्वीकारली.
वर्षा उसगांवकर यांची मालिकेत एन्ट्री एका सुंदर कथक नृत्याने झाली होती. हे नृत्य प्रसिद्ध कोरिओग्राफर गोपी कृष्ण यांनी दिग्दर्शित केले होते. या एका सीनने वर्षा यांना संपूर्ण देशभरात लोकप्रिय केले. या यशानंतरच त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. १९९० मध्ये जॅकी श्रॉफसोबत 'दूध का कर्ज' या चित्रपटातून त्यांनी हिंदीत डेब्यू केला आणि पुढे अक्षय कुमार, ऋषी कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले.