‘या’ सेलेब्सच्या लग्नात आले विघ्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 02:39 AM2017-02-27T02:39:57+5:302017-02-27T02:40:17+5:30

बॉलिवूडमध्ये लिंकअप, ब्रेकअपच्या घटना काही नवीन नाहीत.

'This' came to the marriage of Celebs marriage! | ‘या’ सेलेब्सच्या लग्नात आले विघ्न!

‘या’ सेलेब्सच्या लग्नात आले विघ्न!

googlenewsNext

-सतीश डोंगरे
मुंबई - बॉलिवूडमध्ये लिंकअप, ब्रेकअपच्या घटना काही नवीन नाहीत. आज एकत्र दिसणारे जोडपे उद्या एकत्र राहतीलच याची खुद्द ते जोडपेही हमी देऊ शकत नाहीत. त्यामुळेच साखरपुडा झाला म्हणजे त्याचे रूपांतर लग्नात होईलच याची धाकधूकच असते. आता हेच बघा ना, साउथ सुपरस्टार नागार्जुन अक्कीनेनी याचा मुलगा अखिलचा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती जीवीके रेड्डी यांची नात श्रीया भूपाल हिच्यासोबत अतिशय धूमधडाक्यात साखरपुडा पार पडला होता. लवकरच हे दोघे लग्नाच्या बंधनातही अडकणार होते, मात्र मध्येच माशी शिंकली अन् या दोघांचे लग्न तुटल्याच्या बातम्या समोर आल्या. अर्थात अखिल आणि श्रीया लग्न तुटलेले पहिलेच जोडपे नसून यापूर्वीदेखील काही सेलेब्सला अशा प्रसंगांचा सामना करावा लागला, त्यांचाच हा खास वृत्तांत...
>राखी सावंत आणि इलेश
‘आयटम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतने तर चक्क टीव्हीवरच स्वत:च्या स्वयंवरचा घाट घातला होता. या स्वयंवरात भाग घेतलेल्या १६ स्पर्धकांपैकी इलेश नावाच्या स्पर्धकाबरोबर लग्न न करता तिने साखरपुडाही उरकून घेतला होता. मात्र, येथेच पाल चुकचुकली. कारण या कार्यक्रमात राखीचा विवाह दाखविण्यात येणार होता, मात्र साखरपुडाच दाखविला गेल्याने हे नाते क्षणभंगुर असल्याचा प्रेक्षकांना अंदाज होता. अगदी ठरल्याप्रमाणे तसेच घडले, काही काळानंतर राखीने इलेशला आपल्या जीवनातून बाहेर केले.
विवेक ओबेरॉय-गुरप्रित गिल
विवेक ओबेरॉय आणि गुरप्रित गिल या जोडीनेदेखील इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर २०००मध्ये साखरपुडा केला होता. मात्र हे नाते फार काळ टिकले नाही. कारण २०१५ मध्ये विवेकने प्रियांका अल्वा हिच्याशी विवाह केला. सध्या तो इंडस्ट्रीमधून गायब असला तरी संसारात सुखी आहे.
मल्लिका शेरावत-विजय सिंह
राखी सावंतप्रमाणेच या यादीत मल्लिका शेरावत हिचाही समावेश आहे. कारण मल्लिकानेही ‘द बॅचलरेट इंडिया मेरे खयालों की मल्लिका’ या टीव्ही शोमध्ये स्वत:चे ‘स्वयंवर’ रचले होते. यामध्ये तिने विजय सिंह याची लाईफ पार्टनर म्हणून निवडही केली होती. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात तिने विजय सिंहबरोबर साखरपुडा केला होता. मात्र पुढे वर्षभरातच त्याच्याशी सर्वप्रकारचे नाते तोडले.
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन
एकेकाळचे बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारे जोडपे म्हणजे अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर हे होय. कारण त्या वेळी या दोघांची केमेस्ट्री अशी काही जुळली होती, की हे दोघेही आयुष्यभर एकत्र राहतील, असेच काहीसे दिसत होते. विशेष म्हणजे अशा काही घटना घडल्या होत्या ज्यामुळे हे दोघांचा विवाह निश्चित समजला जात होता. त्यातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून २००२मध्ये या दोघांनी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साखरपुडा उरकला. मात्र फेब्रुवारी २००३ पर्यंत दोघांनी अचानकच वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
अक्षयकुमार आणि रवीना टंडन
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आणि रवीना टंडन यांचीही काहीशी अशीच कथा आहे. एका मुलाखतीदरम्यान रवीनाने सांगितले होते की, ‘तिने अक्षयकुमार याच्याबरोबर गुपचूप लग्न केले होते. मात्र या लग्नामुळे आपली लोकप्रियता कमी होईल, या भीतीने अक्षयने ही बाब कधीच समोर येऊ दिली नाही. दरम्यान, या जोडप्यामध्ये ‘खिलाडी’ या सिनेमापासून एकमेकांप्रती वितुष्ट निर्माण झाले होते. अखेर ते विभक्त झाले.’

Web Title: 'This' came to the marriage of Celebs marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.