‘द इंडिया स्टोरी’मध्ये श्रेयस तळपदेसोबत झळकणार 'ही' साउथ अभिनेत्री, रिलीज डेट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:42 IST2026-04-27T16:41:35+5:302026-04-27T16:42:01+5:30
काय आहे 'द इंडिया स्टोरी'ची कथा?

‘द इंडिया स्टोरी’मध्ये श्रेयस तळपदेसोबत झळकणार 'ही' साउथ अभिनेत्री, रिलीज डेट समोर
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहकार्याने तयार झालेला ‘द इंडिया स्टोरी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून निर्माते व लेखक सागर बी शिंदे आहेत.
सामाजिक आणि राष्ट्रीय आशय मांडणाऱ्या या चित्रपटात रासायनिक पदार्थांच्या गैरवापराचे, विशेषतः शेतीत वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी संबंधित घोटाळ्यांचे धक्कादायक वास्तव उलगडण्यात आले आहे. ही कथा केवळ एका कुटुंबाच्या संघर्षापुरती मर्यादित न राहता देशभरातील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेवर होणाऱ्या परिणामांवर भाष्य करते. व्यवस्थेतील त्रुटी आणि कठोर नियमांची गरजही यात अधोरेखित करण्यात आली आहे.
निर्माते सागर बी शिंदे यांनी सांगितले की, “ही कथा वास्तवाशी निगडित असून अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या, परंतु लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकते. कीटकनाशकांतील रसायनांचा गैरवापर हा केवळ पर्यावरणीय नव्हे, तर मानवी संकट आहे.”
दिग्दर्शक चेतन डीके यांनी चित्रपटाच्या निर्मितीतील संपूर्ण टीमच्या मेहनतीचे कौतुक करत, कलाकारांनी कथेला वास्तवदर्शी रूप देण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची दखल घेतली. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांनी प्रभावी अभिनय सादर केल्यामुळे चित्रपट अधिक परिणामकारक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे, काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाला भावनिक खोली आणि नवीन आकर्षण मिळणार असल्याची चर्चा आहे. आजच्या प्रेक्षकांचा आशयप्रधान चित्रपटांकडे वाढता कल लक्षात घेता, ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट योग्य वेळी येणारा आणि चर्चेला वाव देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या चित्रपटाच्या निर्मितीत सह-निर्माते सुमित बागडे, अनीता जाधव, विनायक सैदानी, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी यांचे योगदान आहे. तसेच छायांकन निशांत भागवत, संगीत मंगेश धाकडे, संकलन आशिष म्हात्रे, गीतलेखन शकील आझमी आणि ध्वनी रचना अनमोल भावे यांनी केली आहे. ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून झी स्टुडिओजद्वारे जगभरात रिलीज करण्यात येणार आहे.