शाहरुखने केला ९५ लाख रुपयांचा त्याग! अभिनेत्याचा हा किस्सा ऐकून तुम्हीही त्याला म्हणाल बॉलिवूडचा 'किंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:58 IST2026-04-29T14:56:20+5:302026-04-29T14:58:33+5:30
शाहरुखच्या फिल्मी कारकीर्दीमधील हा भावुक करणारा किस्सा समोर आला आहे.

शाहरुखने केला ९५ लाख रुपयांचा त्याग! अभिनेत्याचा हा किस्सा ऐकून तुम्हीही त्याला म्हणाल बॉलिवूडचा 'किंग'
बॉलिवूडमधील 'हम तुम्हारे हैं सनम' हा चित्रपट शाहरुख खान, सलमान खान आणि माधुरी दीक्षित या त्रिकुटासाठी ओळखला जातो. मात्र, या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान एक अशी वेळ आली होती, जेव्हा शाहरुख खानने त्याचे मानधन घेण्यास नकार दिला होता. शाहरुखच्या या स्वभावामुळे तो बॉलिवूडचा किंग म्हणून का ओळखला जातो, याची तुम्हालाही ओळख होईल.
'हम तुम्हारे हैं सनम' या चित्रपटाची सुरुवात १९९७ मध्ये झाली होती. मात्र, चित्रपटाचे टायटल, गाणी, संगीतकार आणि गायक वारंवार बदलल्यामुळे चित्रपट प्रदर्शनास मोठा उशीर झाला. इतकेच नाही तर १९९७ चा काळ आणि २००२ चा काळ यात फॅशनमध्ये मोठे बदल झाले होते. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी माधुरी दीक्षित आणि इतर कलाकारांच्या लूक आणि हेअरस्टाईलमध्ये मोठे बदल करावे लागले. कारण २००२ मध्ये चित्रपट त्या काळाला सुसंगत वाटेल हा त्यामागे विचार होता.
या चित्रपटात शाहरुख खान, सलमान खान आणि माधुरी दीक्षित असे तीन मोठे मेगास्टार होते. चित्रपट पूर्ण व्हायला ५ वर्षे लागली, तरीही केवळ या तिघांच्या मैत्रीमुळे आणि कमिटमेंटमुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला. या तिन्ही स्टार्सनी शुटिंगमधील बदल आणि तारखांच्या बाबतीत निर्मात्यांना पूर्ण सहकार्य केले. अखेर २८ मे २००२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
रोमँटिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खानने या चित्रपटात पत्नीवर संशय घेणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. खरं तर शाहरुखला ही भूमिका फारशी पटली नव्हती. त्याने निर्मात्यांना सांगितले होते की, "अशी व्यक्तिरेखा मला समजत नाही," पण निर्माते के.सी. बोकाडिया यांनी विनंती केल्याने त्याने या भूमिकेला होकार दिला. महत्वाची गोष्ट म्हणजे, शाहरुखने या चित्रपटासाठी मानधन म्हणून एक रुपयाही घेण्यास नकार दिला.
का नाकारले ९५ लाखांचे मानधन?
शाहरुखला या चित्रपटासाठी ९५ लाख रुपये मानधन देण्यात येणार होते. मात्र, चित्रपट रेंगाळल्यामुळे त्याचे बजेट आधीच खूप वाढले होते. के.सी. बोकाडिया यांनी एका मुलाखतीत सांगितले की, शाहरुखने पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला. "मी एखाद्या लग्नात ५ मिनिटे जाऊन ९५ लाख रुपये कमावू शकतो, पण तुम्हाला ही रक्कम देण्यासाठी तुमची मालमत्ता विकावी लागेल.", असं शाहरुख त्यांना म्हणाला होता. शाहरुखने मानधनाचा त्याग केल्याने हा चित्रपट पूर्ण होऊन प्रेक्षकांसमोर येऊ शकला. निर्मात्यांनी शाहरुखचे कौतुक करताना म्हटले की, "त्याच्यासारखा चांगला अभिनेता आणि माणूस होणे कठीण आहे."