रणवीर सिंहला कोर्टाचा दिलासा; 'कांतारा' वाद मिटणार, पण 'ही' महत्त्वाची अट पाळावी लागणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:02 IST2026-04-28T13:01:58+5:302026-04-28T13:02:17+5:30
'कांतारा' चित्रपटातील 'दैवी' पात्राची नक्कल प्रकरणी अभिनेता रणवीर सिंह कायदेशीर कचाट्यात सापडला होता.

रणवीर सिंहला कोर्टाचा दिलासा; 'कांतारा' वाद मिटणार, पण 'ही' महत्त्वाची अट पाळावी लागणार!
'कांतारा' चित्रपटातील 'दैवी' पात्राची नक्कल आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह कायदेशीर कचाट्यात सापडला होता. रणवीर सिंहला कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. रणवीरने न्यायालयात सादर केलेली बिनशर्त माफी आणि प्रतिज्ञापत्र न्यायालयाने मान्य केले आहे. पण, रणवीर सिंहसमोर कोर्टानं महत्त्वाची अट ठेवली आहे.
२०२५ मध्ये गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) रणवीर सिंहने 'कांतारा' चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या भूमिकेचे कौतुक करताना देवतेची नक्कल केली होती. यावेळी बोलताना त्याने देवतेचा उल्लेख 'भूत' असा केला होता. यामुळे धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचा आरोप करत वकील प्रशांत मेथल यांनी बेंगळुरूमध्ये रणवीरविरोधात तक्रार दाखल केली होती.
न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यापूर्वी न्यायालयाने रणवीरला सुनावलं होतं की, "केवळ सेलिब्रिटी आहात म्हणून तुम्हाला धार्मिक बाबींवर असंवेदनशील भाष्य करण्याचा अधिकार मिळत नाही". मात्र, आता रणवीरने आपली चूक कबूल करत मनापासून पश्चात्ताप व्यक्त केल्याने न्यायालयाने मवाळ भूमिका घेतली आहे.
कोर्टाची महत्त्वाची अट कोणती?
न्यायालयाने रणवीरची माफी मान्य करताना एक महत्त्वाची अट घातली आहे. रणवीरला पुढील चार आठवड्यांच्या आत म्हैसूर येथील प्रसिद्ध चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे लागणार आहे आणि तिथे आपली चूक मान्य करून माफी मागावी लागणार आहे. तक्रारदार वकील प्रशांत मेथल यांनीही "धर्मात क्षमा महत्त्वाची आहे" असे म्हणत रणवीरच्या पश्चात्तापानंतर हे प्रकरण संपवण्यास संमती दर्शवली.