'धुरंधर'ला 'प्रोपागंडा' म्हणणाऱ्यांना जावेद अख्तर यांचं उत्तर, सिनेमाचं कौतुक करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:08 IST2026-05-04T11:06:14+5:302026-05-04T11:08:13+5:30
मला माहित नाही की प्रोपागंडा चित्रपट म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, पण...

'धुरंधर'ला 'प्रोपागंडा' म्हणणाऱ्यांना जावेद अख्तर यांचं उत्तर, सिनेमाचं कौतुक करत म्हणाले...
रणवीर सिंहचा मुख्य अभिनय असलेला ‘धुरंधर २’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४६ दिवस उलटले तरी बॉक्स ऑफिसवर आपली पकड घट्ट धरून आहे. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. मात्र, या यशासोबतच ‘धुरंधर’ फ्रँचायझीवर 'प्रोपागंडा' चित्रपट असल्याचा आरोप करत काहींनी टीका केली. आता या वादावर ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली असून त्यांनी या चित्रपटाचे जाहीर कौतुक केले आहे.
नुकत्याच एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जावेद अख्तर यांनी 'धुरंधर' चित्रपटाचं कौतुक केलं. ते म्हणाले की, "मला माहित नाही की प्रोपागंडा चित्रपट म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, पण मला 'धुरंधर' चित्रपट खूप आवडला. हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं झालं तर मला या फ्रँचायझीचा पहिला भाग दुसऱ्या भागापेक्षा जास्त आवडला." त्यांच्या या विधानामुळे चित्रपटसृष्टीत चर्चा सुरू झाली आहे.
प्रोपागंडाच्या आरोपांना उत्तर देताना जावेद अख्तर पुढे म्हणाले की, "प्रत्येक चित्रपटाची आणि कथेची स्वतःची एक विचारधारा असते. केवळ एखाद्या वर्गाला ती कथा आवडली नाही म्हणून त्याला 'प्रोपागंडा' म्हणणे चुकीचे आहे. चित्रपट निर्मात्याचे काम सत्य मांडणे असते आणि प्रत्येक गोष्टीतून प्रेक्षकांना काही ना काही संदेश किंवा नैतिक शिक्षण मिळत असते. त्यामुळे एखाद्या दृष्टिकोनाला 'प्रोपागंडा' नाव देणे हे ज्याच्या त्याच्या समजुतीवर अवलंबून आहे."
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने भारतात ११०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, जगभरात १७०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. रणवीर सिंहसह संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने ४६ दिवसांनंतरही आपली घोडदौड कायम राखली आहे जी बॉलिवूडसाठी एक मोठी ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.