रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 07:07 IST2026-05-02T07:06:51+5:302026-05-02T07:07:50+5:30
हा हल्ला लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असून, तो लोणकरच्या आदेशावरून करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
मुंबई - दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर झालेला गोळीबार हा चित्रपटसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी आणि खंडणी रॅकेट चालवण्यासाठी टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता, असे मुंबई पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
पोलिसांच्या अँटी-एक्स्टॉर्शन सेलने गुरुवारी १५ अटक आरोपींविरुद्ध १,६२४ पानी आरोपपत्र सादर केले. दोन मुख्य संशयित शुभम लोणकर आणि आर्जू हे फरार आहेत. हा हल्ला लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असून, तो लोणकरच्या आदेशावरून करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपपत्रानुसार, बहुतांश आरोपी उत्तर प्रदेशातील बिजौली गावचे रहिवासी आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपपत्रात काय?
आरोपी प्रदीप कुमार जाटव (२२) हा मुख्य शूटर दीपक शर्मा याच्यासह घटनास्थळी उपस्थित होता. पोलिसांच्या मते, लोणकर आणि त्याचा सहकारी प्रवीण लोणकर यांनी या कटात महत्त्वाची भूमिका बजावली. शस्त्रे, दारुगोळा, मोटारसायकल तसेच तांत्रिक साहाय्य देत आर्थिक आणि रणनीतिक नियोजन केले. १ फेब्रुवारी रोजी पहाटे १२:४५ वाजता जुहू परिसरातील शेट्टी यांच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर किमान पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. बिष्णोई टोळीशी संबंधित शुभम लोणकर आणि आर्जू बिष्णोई यांना फरार आरोपी दाखवण्यात आले आहे. या घटनेची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती, असे पोलिसांनी सांगितले.