'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात खोट्या मिश्या का लावल्या? ३ वर्षांनी अक्षयचा खुलासा, म्हणतो- "माझ्या चेहऱ्यावर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:04 IST2026-04-22T14:03:12+5:302026-04-22T14:04:41+5:30
२०२२ मध्ये आलेल्या 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात खोट्या मिश्या चिकटवून अभिनय केल्याने अक्षय ट्रोल झाला होता. आता ३ वर्षांनी अक्षयने यामागचा खुलासा केला.

'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात खोट्या मिश्या का लावल्या? ३ वर्षांनी अक्षयचा खुलासा, म्हणतो- "माझ्या चेहऱ्यावर..."
अक्षय कुमार सध्या चांगलाच चर्चेत आहेत. सध्या अक्षयचे एकामागोमाग एक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतंच अक्षयची भूमिका असलेला 'भूत बंगला' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने जवळपास १४ वर्षांनी अक्षयने प्रियदर्शन यांच्यासोबत काम केलं. त्यानिमित्त एका मुलाखतीत अक्षयने एक खुलासा केला. २०२२ मध्ये आलेल्या 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात खोट्या मिश्या चिकटवून अभिनय केल्याने अक्षय ट्रोल झालेला. आता ३ वर्षांनी अक्षयने यामागचा खुलासा केला.
शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये अक्षयने 'नकली मिश्या' प्रकरणावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. अक्षय खुलासा करत म्हणाला, "मी एकाच वेळी अनेक चित्रपट आणि वेगवेगळ्या लूकवर काम करत असतो. उदाहरणार्थ, आता मी जी दाढी वाढवली आहे, त्यासाठी मला सुमारे ६ आठवडे लागले आणि त्या काळात मी दुसरे कोणतेही काम केले नाही. त्यामुळे मी मेहनत करत नाही, असे मुळीच नाही."
अक्षय कुमार पुढे म्हणाला, "'सम्राट पृथ्वीराज'मध्ये कथेनुसार एका विशिष्ट प्रकारच्या मिशांची गरज होती आणि तशा मिशा माझ्या चेहऱ्यावर नैसर्गिकपणे उगवत नव्हत्या. कदाचित त्या बनावट मिशा प्रेक्षकांना आवडल्या नसतील. पण शेवटी हा अभिनयाचा भाग आहे. तशा मिशा वाढवणे माझ्यासाठी शक्य नव्हते, म्हणूनच मला बनावट मिश्या लावाव्या लागल्या. जर लोकांना ते आवडले नसेल, तर मी त्यांची माफी मागतो."
'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाबद्दल
३ जून २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले होते. सुमारे १७५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात फक्त ९० कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट महान योद्धे पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित होता.
अक्षय कुमारच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'भूत बंगला' या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या हॉरर-कॉमेडी चित्रपटात अक्षयसोबत परेश रावल, राजपाल यादव, तब्बू आणि वामिका गब्बी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.