'द केरळ स्टोरी २' नंतर काम मिळेना? अनुराग कश्यपने केलेल्या टीकेवरही अदिती भाटियाचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:40 IST2026-04-24T11:39:19+5:302026-04-24T11:40:12+5:30
अदितीने याआधी बालकलाकार म्हणून काही सिनेमे केले आहेत. मात्र पहिल्यांदाच ती मुख्य अभिनेत्री म्हणून सिनेमात झळकली.

'द केरळ स्टोरी २' नंतर काम मिळेना? अनुराग कश्यपने केलेल्या टीकेवरही अदिती भाटियाचं उत्तर
'ये है मोहोब्बते' मालिकेत 'रुही'च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदिती भाटिया सध्या 'केरळ स्टोरी २'मुळे चर्चेत आहे. सिनेमात ती दिल्या पलिवाल या राजस्थानी मुलीच्या भूमिकेत दिसली. अदितीने याआधी बालकलाकार म्हणून काही सिनेमे केले आहेत. मात्र पहिल्यांदाच ती मुख्य अभिनेत्री म्हणून सिनेमात झळकली. 'द केरळ स्टोरी २'ला अनेकांनी प्रोपगंडा सिनेमा म्हटले. फिल्ममेकर अनुराग कश्यपनेही सिनेमावर टीका केली होती. याकडे अदिती कसं बघते? याचं तिने उत्तर दिलं.
'द केरळ स्टोरी २'नंतर काम मिळवणं कठीण झालं आहे का? असा प्रश्न अदितीला विचारण्यात आला.'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मी बाकी फिल्ममेकर्सना भेटलेले नाही. किमान या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना माझं काम दिसू शकेल. पण जर हे फिल्ममेकर्स माझं काम बघणं सोडून सिनेमाच्या मु्द्द्यावर लक्ष देत असतील तर तो त्यांचा निर्णय आहे. 'केरळ स्टोरी २' केल्यानंतर मला काम मिळेल की नाही इतका दूरचा विचार मी केलेलाच नाही. पण इतर फिल्ममेकर्सनेही हे समजून घेतलं पाहिजे की कलाकार म्हणून आम्ही फक्त अभिनय करत आहोत आणि ती भूमिका साकारत आहोत. सिनेमाचा जो विषय होता त्यातही माझा तितकाच सहभाग होता. पण मी अभिनेत्री म्हणून प्रोफेशनली माझं काम केलं. त्यांनी जर माझं काम पाहिलं तर मला आशा आहे की आणखी सिनेमे करण्यासाठी मला दरवाजे खुले होतील."
हा सिनेमा का स्वीकारला? यावर अदिती म्हणाली, "मी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांच्यासोबत बऱ्याच काळापासून संपर्कात होते. एका वेगळ्या प्रोजेक्टसंदर्भात आमची चर्चा सुरु होती. मग या सिनेमाच्या ऑडिशनसाठी मला फोन आला. मुकेश सर मला कायम एक गोष्ट सांगायचे की 'घाईघाईत निर्णय घेऊ नको. थोडी वाट बघ'. मला कायमच एखादी स्ट्राँग भूमिका करायची होती. मग केरळ स्टोरी २ मधील भूमिकेसाठी मी फिट बसते असं त्यांना वाटलं. मी ऑडिशन दिली. नंतर मी फक्त माझ्या भूमिकेची स्क्रिप्ट वाचली. मला सिनेमातील इतर गोष्टी फारशा माहित नव्हत्या. तसंच पहिला पार्ट आणि दुसऱ्या पार्टमध्ये खूप फरक आहे. दुसऱ्या पार्टमध्ये माझी भूमिका १६ वर्षांच्या दिव्याची आहे. मी तिचं कथानक वाचूनच मनातून हलले होते. तसंच अभिनेत्री म्हणून ही भूमिका करताना माझा कस लागणार होता. त्यामुळे सिनेमाला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता."