फार वटवट किंवा टिवटिव करणाऱ्या लोकाना दुर्लक्षून त्यांची जागा दाखवून देण्याच्या कलेत काँग्रेसइतका दुसरा कोणताही पक्ष तरबेज नाही. पण भाजपा गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस संस्कृतीच्या पावलावर पाऊल टाकून वागत असल्याने या कलेबाबतही तूर्तासचा हा सत्ताधारी पक्ष काँग्रेसचे अनुकरण करीत असावा असे दिसते. त्याचे अलीकडच्या काळातील मोठे उदाहरण म्हणजे त्या पक्षाचे खासदार आणि हिन्दी चित्रपटातील नायक शत्रुघ्न सिन्हा. भाजपा हा बोलभांडांचा पक्ष असल्याने तिथे आपल्यावर नक्कीच चवऱ्या ढाळल्या जातील अशा आशेने ते या पक्षात आले. बिहारी बाबू असल्याने पक्ष आपल्याला ते राज्य आंदण देईल अशी त्यांची अपेक्षा होती. विशेषत: आपल्याला त्या राज्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून ‘प्रोजेक्ट’ केले जाईल असेही त्याना वाटत होते. पण तसे काही होत नाही हे पाहाताच त्यांनी पक्षावर टीका करण्यास सुरुवात केली. या टीकेची दखल घेऊन पक्ष आपल्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलेल आणि आपण एकदम प्रकाशझोतात न्हाऊन निघू असेही नंतर त्यांना वाटू लागले. पण तसेही काही झाले नाही. पक्षाने शत्रुघ्न सिन्हा नावाचा कोणी खासदार आहे याचा जणू विसरचा पाडून घेतला. पक्षातर्फे कोणीच काही बोलत नाही म्हटल्यावर आता त्यांनी स्वत:कडे जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘आपण पक्ष आणि राजकारण सोडून द्यायला निघालो होतो पण आपले मार्गदर्शक आणि हितैषी लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्याला तसे करण्यापासून परावृत्त केले’ असे विधान केले आहे. आहे की नाही मजा? मुळात आज अडवाणी यांच्याच राजकारणावर आणि भाजपातील त्यांच्या स्थानावर भले मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. कुठे तरी काही तरी आणि कशी का होईना आपली वर्णी लागावी या धडपडीत अडवाणी स्वत:च असताना ते काय सिन्हा यांना मार्गदर्शन करणार आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणार. पण अडवाणी यांनी म्हणे थेट महात्मा गांधी यांच्या एका वचनाचा हवाला देऊन सिन्हा यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. या सल्ल्यानुसार आपल्या भूमिकेवर (?) खंबीर राहून मानमरातब आणि प्रतिष्ठा मिळविण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. परंतु सध्या तरी ते त्यांच्या मते ‘दमन और सम्मान के बीच झूल रहे है’. त्यांचे हे झुलणे अक्षय राहील अशीच भाजपाची सध्याची एकूण ‘नीती’ दिसते.
वारे गुरु, वारे शिष्य!
By admin | Updated: January 28, 2016 03:30 IST