पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यातील वाद सध्या शिगेला पाेहोचला आहे. ९ मे २०२३पासून इमरान खान जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ते कैदेत आहेत; पण ते पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यापासून आणि त्यानंतर तुरुंगात जाण्याआधी आणि नंतरही मुनीर यांच्यावर त्यांनी अनेकदा ताशेरे ओढले आहेत.
आताही इमरान खान यांनी मुनीर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडताना म्हटलं आहे, माझ्यावरच्या रागामुळे आणि माझा बदला घेण्यासाठीच मुनीर यांनी माझी पत्नी बुशरा बिवीला खोट्या आरोपांवरून तुरुंगात बंद केलं होतं. इमरान खान यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये लिहिलं आहे, मी जेव्हा पाकिस्तानचा पंतप्रधान होतो, त्यावेळी असीम मुनीर यांना ‘आयएसआय’च्या पदावरून हटवलं होतं. त्यावेळी त्यांनी माझी पत्नी बुशरा बिवीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता; पण बुशरा यांनी मुनीर यांच्याशी बोलण्यास साफ नकार देताना ‘राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही आणि अशा प्रकरणांत मी पडत नाही,’ असं सांगितलं होतं.
इमरान खान यांचं म्हणणं आहे, त्यानंतर बुशरा यांना एकामागोमाग एक खोट्या प्रकरणांत मुद्दाम अडकवलं जात आहे. बुशरा बिवी या एक गृहिणी आहेत. राजकारणाशी त्यांचा काहीएक संबंध नाही. गेल्या एक महिन्यापासून पत्नीला मला भेटूही दिलेलं नाही. बदल्याच्या भावनेनं मुनीर यांनी सगळंच ताळतंत्र सोडलं आहे. त्यांच्यामुळेच बुशरा बिवी यांना चौदा महिने तुरुंगात काढावे लागले.
इमरान खान यांनी न्यायाधीशांपासून ते जेल प्रशासनापर्यंत सगळ्यांनाच धारेवर धरलं आहे. इमरान खान गेल्या साधारण दोन वर्षांपेक्षाही अधिक काळापासून रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात कैद आहेत. जेल प्रशासनाच्या नियमाप्रमाणे १ जून रोजी त्यांची आणि बुशरा बिवी यांची भेट होणार होती; पण इमरान यांचं म्हणणं आहे, न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून आमची ही भेट रद्द करण्यात आली. ९ मे २०२३ रोजी जे काही घडलं आणि मला अटक करण्यात आली, त्या सर्व गोष्टी ‘लंडन प्लॅन’चा हिस्सा आहेत. माझी ‘पीटीआय’ पार्टी आणि मला नामशेष करणं हाच त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे बेकायदेशीर पद्धतीनं मला तसंच माझ्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि शरीफ व झरदारीसारख्या भ्रष्ट लोकांना देशाच्या माथी मारण्यात आलं.
इमरान खान पाकिस्तानचे पंतप्रधान असताना असीम मुनीर हे पाकिस्तानी सिक्रेट एजन्सी ‘आयएसआय’चे प्रमुख होते. २०१८पर्यंत मुनीर आणि पाकिस्तानी लष्कर यांचं चांगलं साटंलोटं होतं. मार्च २०१८मध्ये ‘हिलाल-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा दुसरा सर्वोच्च पुरस्कारही त्यांना देण्यात आला. २५ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांना ‘आयएसआय’चे डायरेक्टर जनरल करण्यात आलं; पण त्यानंतर आठच महिन्यांत जून २०१९मध्ये मुनीर यांना हटवण्यात आलं. इतक्या कमी कालावधीत कोणालाही डीजी पदावरून अवनत करण्यात आलं नव्हतं. या सर्व प्रकरणात इमरान यांचा हात होता आणि त्यामुळेच मुनीर यांचा इमरान यांच्यावर संताप आहे, असं म्हटलं जातं. त्याचाच सूड मुनीर माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर उगवत आहेत. त्यामुळेच ते आमच्या मागे हात धुऊन लागले आहेत असं इमरान यांचं म्हणणं आहे.