शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावात रेशनला ‘अंगठा’, कर्मचाऱ्यांच्या हजेरीला का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 07:21 IST

गावपातळीवरील ‘पॉस’ मशीनवर अंगठा दिल्याशिवाय रेशन मिळत नाही. मात्र, हजारो रुपये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑनलाइन सक्ती नाही, ही विसंगती आहे.

सुधीर लंके आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगरगावपातळीवरील ‘पॉस’ मशीनवर अंगठा दिल्याशिवाय रेशन मिळत नाही. मात्र, हजारो रुपये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑनलाइन सक्ती नाही, ही विसंगती आहे.

राज्यातील ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात दररोज येतात का, हे तपासण्यासाठी त्यांना बायोमॅट्रिक हजेरी सक्तीची करा, अशी मागणी राज्य शासनाकडे गोविंद कामतेकर या नागरिकाने केली आहे. या मागणीवरून ग्रामविकास विभागाने सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवत जिल्हा परिषदांकडून कार्यवाही करून घेण्यास सांगितले आहे. गावपातळीवरील कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती हा सातत्याने कळीचा मुद्दा ठरलेला आहे. गाव छोटे दिसत असले तरी त्याच्या सेवेत अनेक कर्मचारी आहेत. प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक,  अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य विभागाच्या आशा वर्कर, आरोग्य सेविका, वैद्यकीय अधिकारी, पशुधनाच्या सेवेसाठी पशुधन पर्यवेक्षक, कृषी सहायक, तलाठी, वायरमन, वनपाल, ग्रामसेवक, बांधकाम विभागाचे अभियंते अशी यादी केली तर सतराहून अधिक शासकीय आस्थापना थेट गावांशी संबंधित आहेत. हे सगळे मनुष्यबळ खरोखरच नियमितपणे गावात येते का?  येत असेल तर वरिष्ठांना अथवा मंत्र्यांना ते कसे समजते?

ग्रामपंचायत हे शासकीय कार्यालय आहे. पण, आपल्या अनेक ग्रामपंचायती आठ-आठ दिवस उघडत नाहीत हे वास्तव आहे. आमच्याकडे अनेक ग्रामपंचायतींचा कारभार असल्याने दररोज गावात येणे शक्य नाही, असे ग्रामसेवक भाऊसाहेब सांगतात. ते खरेही आहे. कारण शासन ‘एक गाव, एक ग्रामसेवक’ देऊ शकलेले नाही. तलाठी आप्पांचेही असेच आहे. पण, किमान हे ग्रामसेवक व तलाठी भाऊसाहेब दुसऱ्या गावात तरी हजर असतात का?  पंचायत समितीत गेल्यानंतरही ‘साहेब फिरतीवर आहेत,’ असे सांगितले जाते. पण, साहेब नक्की असतात कोठे?

राज्य शासनाचा कामकाजाचा आठवडा आता पाच दिवसांचा आहे. इतर दिवसांची कामकाजाची वेळ सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा अशी आहे. मात्र, काही कर्मचारी सकाळी ११ नंतर येतात व दुपारी गायब होतात, अशा तक्रारी असतात. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, असा शासन नियम आहे; जे आज व्यवहारात शक्य नाही. कारण, कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी शासनाने गावपातळीवर सुविधाच निर्माण केलेल्या नाहीत. आम्ही मुख्यालयी राहतो की नाही यापेक्षा आम्ही कामावर वेळेवर येतो का व कामकाज काय करतो हे तपासा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. पण, ही तपासणी करण्याची शासनाची इच्छाशक्ती दिसत नाही. 

प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यासाठी जयंत पाटील अर्थमंत्री असताना काही शाळांत पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला होता. पण, पुढे त्यावर कार्यवाही झाली नाही. शासन ई-प्रशासनाचा गजर करते.  प्रशासकीय कामकाज गतिमान व ‘पेपरलेस’  होण्यासाठी १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सध्या अनेक विभागांचे कामकाज ऑनलाइन चालते. अंगणवाडी सेविकांकडे स्मार्ट मोबाइल आहेत. शाळांत संगणक आहेत. ई-ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीकडे संगणक परिचालक आहे. एवढे सगळे असताना कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी ही अवघड बाब नाही. काही ठिकाणी इंटरनेट कनेेक्टिव्हिटी, वीज या समस्या असू शकतात. तेथे पर्याय शोधता येतील. 

बायोमेट्रिकमुळे शासनावर आर्थिक बोजा पडेल, असे सांगितले जाते.  अहमदनगर जिल्ह्यात दोन शिक्षकांनी शाळेत न जाता पोटशिक्षक नेमले होते, असे उघडकीस आले. पोटशिक्षकांना मासिक पाच-दहा हजार रुपये देऊन नियमित शिक्षक घरबसल्या फुकट पगार खात होते. या एका कामचुकार शिक्षकाच्या मासिक पगाराएवढाही खर्च बायोमेट्रिकसाठी लागणार नाही. शिवाय ग्रामपंचायत अथवा शाळेत एक मशीन बसले तरी गावात येणारे सर्व विभागाचे कर्मचारी त्यावर हजेरी नोंदवू शकतात. गुणवान कर्मचाऱ्यांचाही यात फायदा आहे. कारण त्यांचे काम नोंदले जाईल व कामचुकार उघडे पडतील. गावपातळीवरील ‘पॉस’ मशीनवर अंगठा दिल्याशिवाय रेशन मिळत नाही. रेशनच्या पाच किलो धान्याची शासकीय किंमत १३ रुपये आहे. त्यासाठी ऑनलाइन हजेरी आहे. मात्र, हजारो रुपये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑनलाइन सक्ती नाही, ही विसंगती आहे.