- अशोक दातार
‘रस्त्यावर होणारे अपघात हे रस्त्यांची बांधणी करणाऱ्या इंजिनिअर्सच्या चुकीमुळे होतात’, हे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच केलेले विधान मला पूर्णपणे मान्य नाही. हा अपघातांच्या कारणमीमांसेमागील एक मुद्दा असू शकेल; पण केवळ या एकाच तर्काने अपघाताच्या समस्येचा अभ्यास करणे उचित ठरणार नाही. रस्त्याचे डिझाइन, संबंधित परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करीत केलेली रस्त्यांची बांधणी, वाहनचालकांचे कौशल्य आणि अपघाताशी निगडित प्रत्येक पायाभूत सुविधेबाबत बिनचूक नियोजन या मुद्द्यांच्या अनुषंगाने अपघातांचा विचार करणे संयुक्तिक ठरेल.
पहिला मुद्दा रस्त्याच्या बांधणीचा! परदेशामध्ये विशेषतः अमेरिका, युरोपातील रस्त्यांची बांधणी अतिशय बिनचूक व संपूर्णतः शास्त्रीय पद्धतीने होते. त्यातील बिनचूकपणा हा कळीचा मुद्दा. आपल्याकडे सर्वाधिक अपघात वळणांवर होतात. वळणावरील रस्त्याचे बांधकाम करताना वाहनाचे उजवे चाक आणि डावे चाक यामध्ये काही अंशांचा फरक यायला हवा. यामुळे वाहनाचा वेगही कमी होईल आणि सुलभतेने वळण घेतले जाईल; पण वळणावर सरळच रस्ते ठेवले तर अपघाताची शक्यता जास्त निर्माण होते.
दुसरा मुद्दा, असल्फाटचे रस्ते की सिमेंटकाँक्रीटचे रस्ते?- आपल्याकडच्या पावसात असल्फाटचे रस्ते उखडले जातात; पण सिमेंटकाँक्रीटच्या रस्त्यांना फारशी इजा पोहोचत नाही; मात्र असल्फाटच्या रस्त्यांमध्ये एक नैसर्गिक बाउन्स असतो. यामुळे वाहनांचे वहन सुलभतेने होते. आपल्याकडे भरपूर पाऊस आणि पावसाच्या दवबिंदूंचा आकारही मोठा आहे. ते सातत्याने रस्त्यावर आदळले की खड्डे पडतात. असल्फाटचे रस्ते बांधताना त्यातील मिश्रणाचे प्रमाण हा कळीचा मुद्दा आहे. त्यातला शास्त्रीय फॉर्म्युला जर तंतोतंत पाळला गेला तर खड्डे तितक्या प्रमाणात पडणार नाहीत.
वाहनाचा वेग आणि टायर याकरिता असल्फाटमधील रस्त्यांमुळे त्यात एक ब्रिदिंग स्पेस निर्माण होते. सिमेंटकाँक्रीटचे रस्ते निश्चल असतात. या रस्त्यांवरून एकाच वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या टायरमुळे घर्षण निर्माण होत कमालीची उष्णता निर्माण होते व टायर फुटून अपघात होण्याचा धोका अधिक संभवतो. मुळात गुळगुळीत रस्ते हा मुद्दा केवळ बोलण्यापुरताच ठीक, प्रत्यक्षात तसे करणे घातकच ठरू शकते. मुळात वाहन चालविणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे की, वाहन चालविणे हे शस्त्र चालविण्यासारखे आहे. त्यात एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे वाहन चालविण्यासंदर्भातल्या नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परदेशात लेनची शिस्त पाळलीच जाते. आपल्याकडेही त्या संदर्भात नियम आहेत. अवजड वाहनचालकाने रस्त्याच्या एकदम डाव्या बाजूने दिलेल्या वेगमर्यादेत वाहन हाकणे गरजेचे आहे; पण बहुतांशवेळा आपल्या महामार्गांवर अवजड वाहने पहिल्या रांगेतून जातात. यामुळे मागच्या वाहनांची कोंडी होते. ओव्हरटेकिंग करीत वाहन पुढे काढण्याच्या प्रयत्नात देखील अपघात होतात.
वाहन चालविताना आपल्याला वाहनाचे तंत्र, वेगाचे गणित आणि रस्त्यावरील वाहतूक याचा अंदाज येणे नितांत गरजेचे आहे. वाहनाचा वेग जेवढा अधिक तेवढी अपघाताची शक्यता अधिक इतका सोपा फॉर्म्युला; तो ध्यानात ठेवत वाहन चालवले तरी अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच, दोन वाहनांमध्ये किती अंतर राखले जावे, याचे देखील नियम आहेत. सामान्य वेगाने चालणाऱ्या वाहनांसाठीच केवळ हे नियम नाहीत, तर जे लोक वेगाने वाहन चालवत आहेत त्यांना आपत्कालीन स्थितीत जर ब्रेक लावावा लागला तर आपले वाहन किती पुढे जाईल याचे भान असणे गरजेचे आहे.
वाहन चलन आणि अपघात या अनुषंगाने आवश्यक त्या पायाभूत सुविधांची निर्मितीही महत्त्वाची आहे. अलीकडे समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याचे मोठे कारण म्हणजे ज्यांना महामार्गावर वाहन चालविण्याचे तंत्र ठाऊक नाही त्यांनी या रस्त्यावर वेगाचा थरार अनुभवायला येणे! मैल अन् मैल एकसारख्या दिसणाऱ्या रस्त्यावर वाहनचालकाला हायवे हिप्नोसिस होऊन अपघात होऊ शकतो. त्यामुळे वाहन चालविताना लक्ष मधूनमधून किंचित विचलित होईल, अशी व्यवस्था रस्त्याच्या बाहेर हवी. रम्बलर्स निर्माण करून वाहनाचा वेग कमी झाला तर वाहनचालक अधिक सतर्क राहू शकतो.
अलीकडे आपल्याकडच्या ट्रकच्या केबिन्स वातानुकूलित होत आहेत. हा एक महत्त्वाचा बदल आहे. कारण शेकडो किलोमीटर ट्रक चालविताना चालकासाठी आरामदायी व्यवस्था असणे गरजेचेच आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा रस्त्याच्या आजूबाजूने जाणाऱ्या लोकांचा. मुळात महामार्ग ही केवळ दोन ठिकाणांना जोडणारी वेगवान व्यवस्था आहे असे समजण्याचे कारण नाही. त्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वसलेल्या गावांत राहणाऱ्या लोकांचा देखील विचार व्हायला हवा. त्यांच्यासाठी महामार्गाखालून अंडरपास, सब-वे यांची निर्मिती व्हायला हवी. हे लोक महामार्गावरून रस्ता ओलांडू लागले तर अपघात होऊच शकतात. या सर्व मुद्द्यांचा सर्वंकष विचार करून रस्तेबांधणी झाली तर निश्चित अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकले, असे मानता येईल. (शब्दांकन : मनोज गडनीस)