शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

रेल्वेचे अपहरण आणि रक्ताच्या नद्या! बलुच लढवय्ये लोक, ते एक दिवस आपली सत्ता उखडून फेकतील

By विजय दर्डा | Updated: March 17, 2025 08:34 IST

पाकिस्तानी रेल्वेचे अपहरण करणारा बलुचिस्तान केवळ २२७ दिवस स्वातंत्र्यात होता. गेली ७५ वर्षे पाकिस्तानने बलुचींचे दमन चालवले आहे.

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह 

‘साऊथ एशियन जर्नलिस्ट फोरम’चा अध्यक्ष या नात्याने मी पाकिस्तानात गेलो होतो. त्यावेळी मी काही बलूच प्राध्यापकांना भेटलो. त्यातील एका महिलेने अत्यंत सुंदर दागिने घातले होते. मी त्याची प्रशंसा केली; तर त्या म्हणाल्या ‘आमच्याकडे अतिशय सुंदर असे काम होते, परंतु आम्हा बलुचींचे दुर्भाग्य म्हणजे आम्ही सर्व काही गमावून बसलो आहोत.’ तेव्हा प्रथमच बलुचींची नाराजी किती खोलवर आहे, हे माझ्या लक्षात आले. ‘आमच्या विद्यापीठात येऊन पाहा काय चालले आहे ते..’ असे त्या मला म्हणाल्या होत्या. ज्या विद्यार्थ्याला आपण भेटाल तो स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करेल. रेल्वेच्या अपहरणानंतर मला ते प्राध्यापक आठवले.   माझ्या मनात असा विचार येतो आहे की बलुचींवर पाकिस्तानने किती जुलूम केले? निर्घृणपणे रक्ताचे केवढे पाट वाहवले?

मागच्या आठवड्यात एका रेल्वेचे अपहरण करून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने संपूर्ण जगाचे लक्ष बलुचिस्तानच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा खेचून घेतले. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले, त्याचवेळी खरे तर बलुचिस्तानही स्वतंत्र झाले होते. तो प्रदेश केवळ २२७ दिवसच स्वतंत्र राहिला. नंतर पाकिस्तानने त्यावर कब्जा केला. आता बलुची त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत.

सुमारे १५० वर्षांपूर्वी बलुचिस्तानवर कलात संस्थानाचे राज्य होते. १८७६ मध्ये इंग्रजांनी कलात संस्थानाशी समझौता करून कलातला संरक्षित राज्याचा दर्जा दिला. भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच ‘पाकिस्तान’ नावाचा एक नवा देश जन्माला येणार हे १९४६ मध्ये स्पष्ट झाले, तेव्हा कलातनेही स्वातंत्र्याचा दावा केला. तेथील शासक मीर अहमद खान यांनी इंग्रजांसमोर आपली बाजू मांडण्यासाठी मोहम्मद अली जीना यांना आपले वकील नेमले होते. ४ ऑगस्ट १९४७ ला दिल्लीत झालेल्या बैठकीत लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यासह पं. जवाहरलाल नेहरू, जीना आणि मीर अहमद खान उपस्थित होते. कलातच्या स्वातंत्र्याला माऊंटबॅटन यांनी सहमती दर्शवली. जीना यांनी कलात, खरान, लास बेला आणि मकरान नावाचा प्रदेश एकत्र करून बलुचिस्तान राष्ट्र निर्माण करता येईल, अशी वकिली केली होती. कलात आणि मुस्लीम लीग यांच्यात ११ ऑगस्ट रोजी झालेल्या समझौत्यानुसार, कलातच्या खान यांनी १२ ऑगस्ट १९४७ ला बलुचिस्तान स्वतंत्र देश घोषित केला. परंतु, त्याची सुरक्षा पाकिस्तानकडे होती. मात्र, १२ सप्टेंबर १९४७ रोजी ब्रिटिशांनी जाहीर केले, एक स्वतंत्र देश होऊ शकेल, अशी बलुचिस्तानची परिस्थिती नाही. 

जीना यांनीच हे षड्‌यंत्र रचले होते, असे मानले जाते. १८ मार्च १९४८ ला जीना यांनी कलातच्या बाजूचा प्रदेश खरान, लास बेला आणि मकरान येथील सरदारांना प्रलोभने दाखवून वेगळे केले. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान बलुचिस्तानला स्वतंत्र होऊ देणार नाही, हे स्पष्ट होते. पाकिस्तान सैन्य घुसवण्याच्या बेतात असताना मीर अहमद खान यांनी त्यांचे  सेना अध्यक्ष ब्रिगेडियर जनरल परवेज यांना सैन्य गोळा करून हत्यारे, दारूगोळ्याची व्यवस्था करण्याचा आदेश दिला; परंतु तोवर खूपच उशीर झाला होता. शेवटी २६  मार्चला पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानवर कब्जा केला. २२७ दिवसांत बलुचिस्तानचे स्वातंत्र्य संपुष्टात आले, परंतु असंतोषाच्या ज्वाळा भडकायला  वेळ लागला नाही. 

मीर अहमद खान यांचे भाऊ राजपुत्र करीम खान यांचे बंड पाकिस्तानी सेनेने तत्काळ चिरडून टाकले, तरीही संधी मिळेल तेव्हा बलुचींनी पाकिस्तानविरूद्ध हरप्रकारे युद्ध छेडण्याचा प्रयत्न जरूर केला. पाचवे बंड २००५ साली झाले. राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या निकटवर्तीय सैन्य अधिकाऱ्याने एका बलुच महिला डॉक्टरवर बलात्कार केला. त्या अधिकाऱ्यावर कारवाई होण्याऐवजी त्या महिलेला शिक्षा करण्यात आली. या घटनेमुळे बुगती जनजातीचे मुखिया नबाब अकबर खान बुगती हे अस्वस्थ झाले. त्यावेळी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाचव्यांदा बंड केले. पाकिस्तानी सैन्याने अकबर बुगती यांच्या घरावर बॉम्बवर्षाव केला. त्यात ६७ लोक मारले गेले. यामुळे बलुची आणखी भडकले. पाकिस्तान सरकारविरुद्ध संघर्ष आणखीन वाढला. २००६ मध्ये अकबर बुगती आणि त्यांच्या डझनभर सहकाऱ्यांची हत्या केली गेली. गेल्या १५ वर्षांत पाकिस्तानी सैन्याने ५००० पेक्षा जास्त बलुचींना एकतर मारून टाकले किंवा गायब केले आहे, असे मानले जाते.

बलुचिस्तान भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानचा ४४ टक्के भाग व्यापतो. तेथील लोकसंख्या केवळ १.५ कोटी इतकीच आहे. तिथल्या सोने, तांबे आणि इतर खनिजांच्या संपत्तीवर चीनचा डोळा आहे. असे असूनही तो प्रदेश आजही गरिबीशी लढतो आहे. तिथल्या लोकांशी पाकिस्तान गुलामांसारखा व्यवहार करतो. चीनच्या प्रकल्पापासून गदर बंदरापर्यंत बलुचींनी केलेला हरेक विरोध अत्याचारांनी  चिरडून टाकण्यात आला. अशा परिस्थितीत जर बलुची रेल्वेचे अपहरण करत असतील तर त्यांचे म्हणणे जगाने ऐकले पाहिजे.

परंतु दुर्भाग्य म्हणजे पाकिस्तान जुलूम करतच आहे आणि बलुचिस्तानच्या विद्रोहाला प्रोत्साहन दिल्याबद्दल भारतावर खापर फोडत आहे. सर्व बलुचींनाही हे ठाऊक आहे की पाकिस्तान किती खोटे बोलत आहे! पाकिस्तानी सेनेची बलुच रेजिमेंट एखादे दिवशी बंड न करो अशी भीती पंतप्रधानांना वाटते आहे. त्यांच्या बलुचिस्तान दौऱ्याचे कारणही हेच होते. मी तर पाकिस्तानला हेच सांगेन, ‘जनाब, भारताकडे बोट दाखविण्याच्या आधी आपले घर पाहा. आपण कुठे आहात आणि आम्ही कुठे आहोत? बलुचिस्तानमध्ये आपण रक्ताचे पाट कधीपर्यंत वाहवणार? बलुच लढवय्ये लोक आहेत. ते आपली सत्ता एक ना एक दिवस उखडून फेकतील.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानrailwayरेल्वेMuslimमुस्लीम