शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

आजचा अग्रलेख: म्हणे, आम्हीच खरे ‘मुतवल्ली’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:02 IST

लोकसभेत सतरा आणि राज्यसभेत बारा असे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मिळून तब्बल २९ तास वादळी चर्चा होऊन अखेर वक्फ सुधारणा ...

लोकसभेत सतरा आणि राज्यसभेत बारा असे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मिळून तब्बल २९ तास वादळी चर्चा होऊन अखेर वक्फ सुधारणा विधेयक पारित झाले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने हा कायदा प्रतिष्ठेचा बनविला होता. त्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची मोट पुन्हा बांधण्यात आली. विरोधी इंडिया आघाडीनेही विधेयकाविरुद्ध दंड थोपटले. दोन्ही सभागृहांत विधेयकाच्या बाजूने व विरोधात अपेक्षेनुसार मतदान झाले. ना सत्ताधाऱ्यांना विरोधकांमध्ये फूट पाडता आली, ना मुस्लीम मतांच्या मुद्द्यावर रालोआमधील घटकपक्ष विरोधकांना फोडता आले. आता विधेयकावर राष्ट्रपतींची सही झाली की, वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाच्या १९९५ च्या कायद्याची जागा हा नवा कायदा घेईल. काँग्रेसचे खासदार विधेयकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. काही ठिकाणी निदर्शने होताहेत. त्याने फार फरक पडेल असे नाही. संसदेतील घणाघाती चर्चेत २०१३ मधील कायद्यातील बदल व त्यांच्या परिणामांवर बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. किमान पाच वर्षे मुस्लीम धर्माचरण करणाऱ्यांना दान देण्याचा अधिकार, केंद्र व राज्याच्या वक्फ बोर्डांवर किमान दोन गैरमुस्लीम सदस्यांची नेमणूक, दोन महिलांना स्थान, जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मालमत्तांचे वाद सोडविण्याचे अधिकार हे मुद्दे चर्चेत हाेते. तथापि, ठळकपणे जाणवला तो भाजपचा या कायद्यासाठी आग्रह.

हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले होते. त्या समितीच्या कार्यपद्धतीवरून वाद झाले. असे वाद राजकीय पक्षांना हवेच असावेत. त्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम चर्चा सुरू राहते. संसदेप्रमाणेच सडकेवरही आपल्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे दाखविण्यामागेही हाच प्रयत्न आहे. बिहार व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशावेळी रालोआतील कथित धर्मनिरपेक्ष पक्षांचा बुरखा फाटला तर भाजपला हवा असेल आणि डळमळीत झालेली इंडिया आघाडी वक्फ विधेयकाच्या निमित्ताने पुन्हा सावरली हा आनंद काँग्रेसला असेल. वक्फ मालमत्तांची व्यवस्था पाहणाऱ्याला मुतवल्ली म्हणतात. अरबी भाषेतील या शब्दाचा अर्थ विश्वस्त किंवा व्यवस्थापक असा आहे. सगळेच राजकीय पक्ष मुस्लिमांचे आम्हीच वाली आहोत, मुतवल्ली आहोत, असा दावा करीत आहेत. या कायद्याचा हेतू वक्फ मालमत्तांचा वापर गरीब मुस्लीम, महिलांचे कल्याण, शिक्षण-आरोग्यासाठी व्हावा म्हणून आम्ही झटत आहोत, असा भाजपचा दावा आहे. पण, ज्यांचे कल्याण होणार आहे त्यांचा या दाव्यावर पूर्ण विश्वास का नाही, याचे उत्तर सापडत नाही.

मुस्लीम धर्मात वक्फ म्हणजे पैगंबर प्रेषित मोहम्मद यांच्या नावे दिलेल्या दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामागे धार्मिक व सामाजिक कृतज्ञतेची भावना असते. कमाईचा ठरावीक हिस्सा पैशाच्या रूपाने संस्थात्मक नोंदीशिवाय गरजू दीनदुबळ्यांना देणे म्हणजे जकात आणि स्थावर व जंगम मालमत्ता दान करणे म्हणजे वक्फ. वक्फचे दान कधी परत घेता येत नाही. म्हणूनच वक्फ मालमत्ता सतत वाढत असतात. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात वक्फ मालमत्तांमध्ये ३९ लाख एकर जमीन आहे. १९१३ ते २०१३ पर्यंत हा आकडा १८ लाख एकर होता, तर त्यानंतरच्या बारा वर्षांत तो २१ लाख एकरांनी वाढला. म्हणजे नव्या मालमत्ता मोठ्या प्रमाणावर वक्फमध्ये येत आहेत. त्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे, असा सत्ताधाऱ्यांचा युक्तिवाद आहे.

सरकारने असे विश्वस्त, व्यवस्थापक बनण्याला कोणाचा आक्षेप नाही. खरा प्रश्न आहे तो, सरकारला मुस्लिमांचा केवळ भाैतिक विकास हवा आहे की, त्यांच्या श्रद्धा, प्रथा-परंपराप्रति आदर बाळगून या वर्गामध्ये दीर्घकाळ टिकणारा विश्वास निर्माण करायचा आहे? कारण, तिहेरी तलाक प्रथा रद्द करताना किंवा नागरिकत्व सुधारणा कायद्यावेळीही आम्ही हे सारे अल्पसंख्याकांच्या भल्यासाठी करतो आहोत, अशी सरकारची भूमिका होती. ‘सबका साथ, सबका विश्वास’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणाही त्याच धर्तीवर आहे. परंतु, इतिहासातील एकेक प्रकरण उकरून काढून एकीकडे अल्पसंख्याकांना लक्ष्य बनविले जात असताना सरकार त्याला मूक संमती देणार आणि दुसरीकडे विरोधकांवर मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा आरोप करीत आम्हीच तुमचे तारणहार आहोत, असे अल्पसंख्याकांना सांगणार. त्यांनी ऐकले नाही तर त्यांच्या देशभक्तीवर शंका घेतली जाणार, हे अनाकलनीय आहे.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी