शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
3
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
4
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
5
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
6
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
7
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
8
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
9
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
10
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
11
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
12
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
13
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
14
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
15
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
16
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
17
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
18
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
19
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
20
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले

आजचा अग्रलेख: पुरे झाली बहिणींची परवड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:15 IST

योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी व गोंधळ संपण्याचे नाव घेत नाही. पंधराशे का होईना; पण दर महिन्याला ठराविक तारखेला नियमितपणे सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हावेत, इतकी साधी अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पुढे काय होणार, या प्रश्नाच्या उत्तरात सत्ताधारी महायुतीमधील झाडून सगळ्या नेत्यांनी, ‘चिंता करू नका, योजना सुरूही राहील आणि सुरळीतही असेल’, असा निर्वाळा दिला आहे. तो यासाठी पटण्यासारखा की, विधानसभा निवडणुकीत भरभरून मते देणाऱ्या लाडक्या बहिणींना मध्येच वाऱ्यावर सोडणे राजकीयदृष्ट्या सत्ताधाऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळेच वित्त मंत्रालय सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आलेला ताण कितीही बोलून दाखवीत असले तरी योजना सुरू ठेवणे सरकारसाठी अपरिहार्य आहे.

हा सरकारसाठी नाजूक विषय बनला आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या ४६ हजार कोटी निधीमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण निर्माण झाला आहे. म्हणूनच महिलांना महिन्याचा हप्ता सहज मिळत नाही. दरवेळी मागणी करावी लागते. मग सरकार कोणता तरी सण किंवा एखाद्या दिवसाचा मुहूर्त शोधते आणि खात्यात पैसे जमा करून तो साजरा करते. फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या एकत्रित हप्त्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चा मुहूर्त शोधला गेला आणि आता एप्रिलच्या रकमेसाठी अक्षय्य तृतीयेची वाट पाहिली जात आहे. १५०० रुपयांचीच अशी परवड सुरू असल्याने एव्हाना राज्यातील सव्वा कोटी महिलांनी निवडणुकीतील दरमहा २१०० रुपयांच्या आश्वासनावर फुली मारली असावी. गेल्या जून महिन्यात योजना सुरू झाली तेव्हा अटी-शर्तींचा फार विचार झाला नव्हता. शासनाच्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या कुटुंबातील महिला आदी अटींची आठवण महायुतीला सत्तेवर आल्यानंतर झाली आणि छाननीतून काही लाख महिलांची नावे वगळली गेली. अशा अपात्र महिलांना दिलेल्या साडेचारशे कोटींपेक्षा अधिक रकमेवर सरकारला पाणी सोडावे लागले. तरीदेखील अशी चाळणी लावण्याला तसा कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. तथापि, योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी व गोंधळ संपण्याचे नाव घेत नाही. पंधराशे का होईना; पण दर महिन्याला ठराविक तारखेला नियमितपणे सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हावेत, इतकी साधी अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. त्याचे कारण सुरुवातीला अर्जप्रक्रिया, पात्रता तपासणी आणि निधी वितरणात प्रशासकीय समन्वयाचा अभाव दिसून आला. अनेक ठिकाणी अर्ज स्वीकारण्यात विलंब झाला.

कागदपत्रांची पडताळणी नीट झाली नाही. नारी शक्ती दूत ॲपमधील त्रुटी, ओटीपी सत्यापनात अडथळे यामुळेही अनेक महिलांना अर्ज पूर्ण करण्यात अडचणी आल्या. आता या अडचणी संपल्याचा दावा केला जात असला तरी योजना अजूनही रुळावर आलेली नाही. सोबतच तिला फसवणुकीचा डाग लागला तो वेगळाच. सुरुवातीला काही पुरुषांनीच महिलांच्या नावाने अर्ज भरले. काहींनी एकाच आधार क्रमांकावरून अनेक महिलांचे लाभ उकळले. काही मध्यस्थांनी कागदपत्रे गोळा करताना डेटा चोरला व त्याचा गैरवापर केला. काहींनी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महिलांकडून पैसे मागितल्याचेही उघड झाले. आता मुंबईत उघडकीस आलेला प्रकार मात्र खूप गंभीर आहे.

पाच-सहा जणांची एक टोळी योजनेचा लाभ देण्याच्या आमिषाने अपात्र महिलांची कागदपत्रे व सह्या घेते आणि बचतगट योजनेतून त्यांच्या नावावर एका वित्तीय संस्थेतून लाखो रुपयांचे कर्ज काढते. त्या बिचाऱ्या महिलांना या भानगडींची कल्पनाच नसते. कर्जाचे हप्ते थकतात तेव्हा चाैकशी होते आणि सगळा प्रकार उघडकीस येतो. हे प्रकरण अपवादात्मक असण्याची शक्यता कमी आहे. फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या चाैकस वृत्तीमुळे हे प्रकरण उजेडात आले. इतरत्रही असे प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, लाडकी बहीण योजनेच्या सगळ्याच लाभार्थी सुशिक्षित नाहीत. गरीब, अशिक्षित महिलांना आर्थिक व्यवहारांचे ज्ञानही पुरेसे नसते. आपल्या माहितीचा, आधारकार्ड व इतर कागदपत्रांचा, सहीचा गैरवापर होऊ शकेल ही जाणीव या महिलांना नसते. अशावेळी सर्व महिलांची माहिती सुरक्षित ठेवण्याची, तिचा गैरवापर होऊ न देण्याची पूर्ण जबाबदारी सरकारी यंत्रणेवर येते. मुंबईतील फसवणुकीचा प्रकार म्हणजे शासन-प्रशासनापुढे कोणत्या नव्या संकटाचे ताट वाढून ठेवले आहे, याची झलक आहे. त्यापासून योग्य तो बोध घेण्याची आणि संबंधित भागातील अधिकाऱ्यांनाही जबाबदारीची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार