शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: सत्ता, संघर्ष, भाऊबंदकी, झारखंडमध्ये नेमकं चाललंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 12:02 IST

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना झारखंडमध्ये जे घडते आहे ते सारे आधुनिक महाभारताचा अनुभव देणारे आहे. सत्तास्पर्धा, त्यासाठी यंत्रणांचा वापर, सत्ताधाऱ्यांना सत्ताच्यूत करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब, रांची ते दिल्लीदरम्यान सुरू असलेले भले-बुरे राजकारण.

यमुनेच्या खोऱ्यात हस्तीनापूर व आवतीभोवती घडलेल्या महाभारताचा छोटा नागपूर पठाराशी काही संबंध होता का हे माहिती नाही. कदाचित अठरा दिवसांच्या महाभारत युद्धात कौरव किंवा पांडवांच्या बाजूने झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल अथवा छत्तीसगडचा काही भाग असलेल्या त्या पठारावरचा एखादा राजा लढलाही असेल. आता हे आठवायचे कारण लोकसभा निवडणूक तोंडावर असताना झारखंडमध्ये जे घडते आहे ते सारे आधुनिक महाभारताचा अनुभव देणारे आहे. सत्तास्पर्धा, त्यासाठी यंत्रणांचा वापर, सत्ताधाऱ्यांना सत्ताच्यूत करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब, रांची ते दिल्लीदरम्यान सुरू असलेले भले-बुरे राजकारण, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध लष्कराच्या साडेचार एकर जमिनीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीकडून गुन्हा, चौकशी टाळताना त्यांचे दिल्लीतून गायब होणे आणि कथितरीत्या रस्ते मार्गाने लपूनछपून तेराशे किलोमीटर अंतरावरील रांची गाठणे, तिथे पुन्हा चौकशी व अटक, दरम्यान सत्ता टिकविण्याची धडपड आणि सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न, असे आधुनिक महाभारत रंगले आहे.

मूळ महाभारतात सुईच्या टोकावर मावेल इतकीही जमीन देणार नाही, असा कौरवांचा हट्ट होता, तर झारखंडच्या या भानगडीच्या मुळाशी लष्कराची नऊ बिघे जमीन आहे. ती हडपणाऱ्या भूमाफियांना हेमंत सोरेन यांचे संरक्षण असल्याचा, त्या माध्यमातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. अटक होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे पदावर असताना अटकेची नामुष्की टळली इतकेच. त्यानंतर चंपई सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यांना सरकार बनविण्यासाठी पाचारण करण्यासाठी राज्यपाल राधाकृष्णन यांनी चोवीस तासांहून अधिक वेळ घेतला. बिहारमध्ये बारा तासात नितीशकुमार यांचा राजीनामा, राजकीय कोलांटउडी व पुन्हा शपथविधी अशा वाऱ्याच्या वेगाने हालचाली व विरोधकांची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये मात्र राज्यपालच गायब, असे चित्र दिसले. सगळीकडून टीका होऊ लागली. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल या महाआघाडीच्या आमदारांनी व्हिडीओवर आमदारांची शिरगणती करून घेतली. सत्ताधारी आघाडी फुटत नाही, असे स्पष्ट झाले तेव्हा राज्यपालांनी स्थापनेला जेमतेम चोवीस वर्षे होत असलेल्या झारखंडचे बारावे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांना शपथ दिली.

या साऱ्या घडामोडींमध्ये खास मूळ महाभारताचे कथानक शोभावे, अशा भाऊबंदकीचाही एक रंजक अंक आहे. निर्वाणीच्या क्षणी सत्ता आपल्या कुटुंबाबाहेर जाऊ नये, असाच सगळ्या राजकारण्यांचा प्रयत्न असतो. तसाच विचार हेमंत सोरेन यांनीही केला असावा. म्हणूनच त्यांच्या पत्नी कल्पना यांचे नाव संभाव्य मुख्यमंत्री म्हणून समोर आले होते. काही महत्त्वाच्या प्रशासकीय तसेच आमदारांच्या बैठकांना त्या उपस्थित राहिल्या होत्या. पर्यायाने कधीकाळी बिहारचाच भाग असलेल्या या राज्यात राबडीदेवी प्रयोग होणार अशी चर्चा सुरू झाली. लालूप्रसाद यादव यांना अशाच न्यायालयीन लढ्यात मुख्यमंत्रिपद सोडावे लागले तेव्हा त्यांनी राबडीदेवींना त्या पदावर बसवले होते. अर्थात, निरक्षर राबडीदेवी व उच्च शिक्षित कल्पना सोरेन यांची तुलना होऊ शकत नव्हती. तथापि, मुद्दा होता विधानसभेच्या सदस्य नसलेल्या पत्नीला मुख्यमंत्री बनविण्याचा.

शिबू सोरेन आता सक्रिय राजकारणातून बाजूला झाले असले तरी त्यांची हेमंत व वसंत ही दोन मुले आणि दिवंगत दुर्गा सोरेन यांच्या पत्नी सीता मुर्मू - सोरेन ही थोरली सून असे तीन आमदार आहेत. कल्पना सोरेन यांचे नाव व पुढे येताच वि पुढ वसंत व सीता सोरेन यांनाही मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडू लागली. आपण घरातील थोरली जाऊ असल्यामुळे मुख्यमंत्रिपदावर पहिला हक्क धाकट्या जावेचा नव्हे, तर आपलाच, असे सीता सोरेन यांचे म्हणणे होते. यामुळे कौटुंबिक कलहाची स्थिती निर्माण झाली. परिणामी, तो कलह टाळला जावा तसेच भाजपकडून घराणेशाहीच्या मुद्द्यावर अधिक हल्ले होऊ नयेत म्हणून हेमंत सोरेन यांना पत्नीला मुख्यमंत्री बनविण्याचा विचार सोडून द्यावा लागला. मंत्रिमंडळात परिवहन तसेच आदिवासी कल्याण खाते सांभाळणारे चंपई सोरेन यांना विधिमंडळ पक्षनेते बनविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अटक टाळता आली नसली तरी हेमंत सोरेन यांनी तूर्त सरकार टिकविले आहे. बिरसा मुंडांच्या भूमीत ईडीच्या रूपाने दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध संघर्षाचा 'उलगुलान' त्यांनी पुकारला आहे. आदिवासी अस्मितेला हाक देण्यात आली आहे. लढाईला तोंड फुटले आहे.

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारण