शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

आजचा अग्रलेख: हे ‘पाप’ कसे धुणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 07:57 IST

या महाकुंभात व्हीआयपी संस्कृतीचा अतिरेक झाला आहे. सरकारचे काैतुक व्हावे म्हणून कथित प्रतिष्ठितांची सरबराई सुरू आहे. सामान्य श्रद्धाळू मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहेत.

मानवी इतिहासातील सर्वांत मोेठे आयोजन म्हणून जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या प्रयागराजच्या महाकुंभाला बुधवारी पहाटे चेंगराचेंगरीचा डाग लागला. माैनी अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेलेल्या बायाबापड्या, आबालवृद्धांचे त्यात बळी गेले. अनेकजण जखमी झाले. मृत व जखमींचा आकडा अधिकृतपणे सांगितला गेलेला नाही. परंतु, सत्तर रुग्णवाहिका धावतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी एका तासात तीनवेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलतात किंवा सर्व तेरा आखाडे अमृतस्नान पुढे ढकलतात, याचाच अर्थ दुर्घटना मोठी आहे. या दुर्घटनेची जबाबदारी कोणीतरी स्वीकारायला हवी.

पुराणकथेनुसार समुद्रमंथनानंतर कुंभातील अमृताच्या वाटणीवरून देव-दानवांमध्ये युद्ध जुंपले. आकाशमार्गे तो अमृताचा कुंभ देवलोकात नेताना जिथे अमृताचे थेंब सांडले ते प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन व नाशिक या चार ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. या ठिकाणी स्नान केल्याने पापांचे क्षालन होते, ही हिंदूंची धार्मिक मान्यता आहे. चार ठिकाणी हा मेळा भरतो म्हणजे देशात दर तीन वर्षांनी एक कुंभमेळा होतो. त्याशिवाय, प्रयागराजला सहा वर्षांनंतर अर्धकुंभ होतो. त्याला पूर्वी ‘माघ मेला’ म्हटले जायचे. आता आयोजनाचे राजकीय महत्त्व मोठे असल्याने मेळा वगैरे शब्द किरकोळ ठरतो. शिवाय यंदा मालिकेतला बारावा अर्थात १४४ वर्षांनंतरचा महाकुंभ म्हणून जोरदार प्रचारही सुरू आहे. काहीही असले तरी हे मानवी इतिहासातील सर्वांत मोठे आयोजन नक्कीच आहे. तब्बल ३५-४० कोटी लोक कुंभपर्वाच्या ४५ दिवसांत प्रयागराजला येतील, असा खुद्द सरकारचाच दावा आहे. हेच सरकार चेंगराचेंगरीनंतर कित्येक तासांत मृत व जखमींचा आकडा देत नाही हा दुर्दैवी विराेधाभास. या कोट्यवधींच्या गर्दीचे नियोजन, व्यवस्थापनाची जबाबदारी केंद्र व राज्य या दोन्ही सरकारवर आहे. त्यातही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वत: शैव आखाड्याशी संबंधित, म्हणजे शब्दश: व्यवस्थापकांच्या भूमिकेत आहेत. हजारो कोटी रुपये  आयोजनावर खर्च होत असताना चेंगराचेंगरीत भाविकांचे जीव जावेत आणि योगींनी त्यासाठी अफवांचे कारण पुढे करावे, हे संतापजनक आहे. खरी व अधिकृत माहिती दडपली जात असताना या दुर्घटनेची समोर आलेली कारणे योगींच्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारी आहेत. या महाकुंभात व्हीआयपी संस्कृतीचा अतिरेक झाला आहे. सरकारचे काैतुक व्हावे म्हणून कथित प्रतिष्ठितांची सरबराई सुरू आहे. सामान्य श्रद्धाळू मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहेत.

माैनी अमावस्येच्या दिवशी कोट्यवधी भाविक गंगा, यमुना व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी येणार हे माहीत असतानाही नदीवरील २८ पैकी बहुतेक पूल बंद ठेवण्यात आले. भल्या पहाटे लाखो लोक संगम नोजकडे जात असताना घाटावर येण्यासाठी व परत जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवण्यात आले नाहीत. २००३ मध्ये नाशिक, २०१३ मध्ये तेव्हाचे अलाहाबाद म्हणजेच खुद्द प्रयागराज, १९८६ मध्ये हरिद्वार येथील चेंगराचेंगरीचा अनुभव गाठीशी असूनही अशी दुर्घटना रोखण्याचे प्रयत्न होऊ नयेत, हा अपराध आणि पाप-पुण्याच्याच भाषेत सांगायचे तर पाप आहे. अशा मोठ्या आयोजनातील तंत्रज्ञानाच्या वापरावर खूप बोलले गेले. पण, तो वापर अनुभवास येत नाही. २०१५ मधील नाशिक सिंहस्थावेळी या तंत्रज्ञानाचा चांगला वापर झाला होता. अमेरिकेतील एमआयटीमध्ये कार्यरत डाॅ. रमेश रासकर व सहकाऱ्यांनी नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी कुंभथाॅन राबविले. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविता आले. कुंभमेळा आणि माणसांचे हरवणे याला शतकांचा इतिहास आहे. पण, नाशिकच्या कुंभमेळ्यात जे हजार-दीड हजार लोक हरवले ते सगळे सुखरूप सापडले. हा प्रयोग नंतर उज्जैनला राबविण्यात आला. प्रयागराजलाही असे करता आले असते. तिथे सरकारने अधिकृतपणे अर्नस्ट अँड यंग या जगातील मोठ्या व्यवस्थापन संस्थेकडे गर्दीवर नियंत्रणाची जबाबदारी सोपविली आहे. तरीदेखील दुर्घटना घडली असेल तर  या संस्थेनेदेखील ही जबाबदारी स्वीकारायला हवी. ती स्वीकारली जात नसेल तर सरकारने त्यांना दिलेली रक्कम रोखायला हवी. अशा काही उपाययोजना केल्या तरच चेंगराचेंगरीच्या रूपाने प्रशासनाच्या हातून घडलेले पाप काही प्रमाणात धुऊन निघेल.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराज