शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचे हजार हात; जे एरव्ही दिसत नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 05:37 IST

Bihar Election: चिराग आणि ओवैसी हे अडथळे असूनही तेजस्वी यांनी झुंज दिली खरी; पण सगळे अंदाज फसले, कारण शेवटी सत्तेपुढे कुठले शहाणपण चालणार?

- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह‘सत्तेचे हजार हात असतात जे दिसत नाहीत’ अशा आशयाची एक जुनी म्हण आहे. जसे सत्तेचे हात दिसत नाहीत, तसे सत्तेचे चमत्कारही दिसत नाहीत, असे म्हणतात.  बिहार निवडणुकीच्या ताज्या निकालांनी ही म्हण खरी करून दाखवली. शेवटी असे झाले तरी काय, की नितीश कुमार पुन्हा सत्तेवर आले? कोरोनानंतरच्या लॉकडाऊनने सगळ्यात जास्त आफत  कोणावर आणली असेल, तर ती  रोजगाराच्या शोधात देशभर पांगावे लागलेल्या मजुरांच्या जगण्यावर! टाळेबंदीत अडकलेल्या शहरातला आपला घास संपला आहे याची जाणीव होताच हे मजूर होते तिथून पायी चालत आपल्या गावाच्या दिशेने निघाले. त्यांच्या वेदना अख्ख्या देशाने पाहिल्या आहेत.  घरी परतण्यासाठी व्याकूळ झालेल्या या मजुरांपैकी कित्येक हजार लोक बिहारचे होते. ते आपली बोचकी डोक्यावर घेऊन उपाशीपोटी राज्यात परतले. जिथे परतले तिथेही त्यांना रोजीरोटी नव्हतीच. मुंबई, दिल्ली, गुजरात, राजस्थानातून पायी आपल्या गावी परतलेल्या या  मजुरांची वेदना निवडणुकीत भारी पडायला हवी होती. बेरोजगारीचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी यायला हवा होता; पण सगळे मुद्दे कोपऱ्यात भिरकावले गेले. हे का झाले असावे? नितीश कुमार यांचे सातव्यांदा मुख्यमंत्री होणे एखादा ‘चमत्कार’ व्हावा, तसेच वाटते आहे. 

अर्थात, हे सगळ्यांना कळते की सत्तेत असण्याचे भरपूर फायदे असतात. आणि त्यात दिल्लीतील सत्ता सोबत असेल तर  काय - ‘सोने पे सुहागा’. कशाला काही कमी म्हणून पडत नाही. एनडीएने सुरुवातीपासूनच नितीश कुमार यांनाच आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा  म्हणून सादर केले होते. स्वाभाविकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रातील डझनभर मंत्री बिहारच्या निवडणुकीत प्रचाराच्या मैदानात उतरले. या सर्वांना साधनसामग्रीची कोणतीच उणीव नव्हती. दिल्लीतील कुमक मदतीला असल्याने सत्ताधारी आघाडीकडे बाकी सगळी तरतूद भरपूर असली, तरीही गेली पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांच्याविरुद्धची मतदारांची वाढलेली  नाराजी सत्ताधारी गोटाच्या एकूण  तयारीला भारी पडेल, असे वाटत होते; पण अखेरीस सत्तेच्या ताकदीचे हजार हात भारी पडले आणि शेवटी विजयाचे मापही सत्तेच्याच पारड्यात पडले.

तसे पाहता यावेळच्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत अनेक महत्त्वाचे प्रश्न होते. नितीश कुमार यांच्या धोरणात्मक अपयशाने सुरुवातीची त्यांची कारकीर्द झाकोळून टाकलेली होती. मतदारांना संभ्रमात टाकणारे आणि त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणी अधिक गहिऱ्या करणारे अनेक प्रश्न बिहार समोर उभे राहिलेले होते : इतकी वर्षे उलटली, इतकी आश्वासने दिली गेली? आणि इतक्या योजना राबवल्या गेल्या तरी बिहारमध्ये उद्योगधंद्यांचा विकास का झाला नाही? आजही या राज्यातल्या लोकांना कामधंद्यासाठी दूरच्या प्रदेशात का जावे लागते? सरकारी नोकऱ्यांत साडेपाच लाख जागा रिकाम्या का आहेत? कोविडच्या काळात राज्यातल्या रुग्णांची आकडेवारी, किती मृत्यू झाले ही माहिती का दडवली गेली?- यासारखे प्रश्न गैरलागू ठरले. बिहारी लोक इतके बुद्धिमान, मेहनती असूनही त्यांना त्यांच्या राज्यात संधी का मिळत नाही? - असे तर कोणी विचारलेही नाही. बिहारच्या आरोग्यव्यवस्थेची स्थिती तर अतिशय वाईट आहे. ताज्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये फक्त दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. संपूर्ण राज्यात फक्त २७९२ डॉक्टर्स आहेत. म्हणजे जवळपास ४५  हजार लोकांसाठी फक्त एक डॉक्टर! भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची अक्षरश: दैना आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात आपल्या झंझावाताने हलचल निर्माण करणाऱ्या  राजदच्या तेजस्वी यादव यांनी हे प्रश्न पूर्ण ताकदीने उपस्थित केले. बिहारच्या तरुणांना त्यांनी १० लाख सरकारी  नोकऱ्यांचे आश्वासन दिले. सरकारचे भांडे फोडण्यासाठी तेजस्वी यादव प्रयत्नांची शिकस्त करत होते, पण त्यांच्याकडे साधने कमी होती. पाठीवर हात ठेवायला पिता लालूप्रसाद यादव मैदानात नव्हते. दुसरीकडे असदुद्दिन ओवैसी तेजस्वी यादव यांची मते खाण्यासाठी मैदानात उतरले होते. ओवैसी यांनी ५ जागा जिंकल्याही.  त्यांनी महाआघाडीची मते खाल्ली, हे उघडच आहे. तिकडे चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या जदयुचे नुकसान केले.  एवढेच नव्हे, तर राजदला मिळणारी दलितांची मतेही पळवली. ओवैसी आणि चिराग हे दोघे भाजपची बी टीम होऊन राजदचे नुकसान करत होते. असे असूनही तेजस्वी ज्या प्रकारे लढले त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली राजद सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. ओवैसी मैदानात नसते, काँग्रेसने मागच्याइतक्या जागा  मिळवल्या असत्या तर आज तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते. कॉंग्रेसला जास्त जागा देणे त्यांना महागात पडले. तरी असेच म्हणावे लागेल की तेजस्वी बिहारची नवी आशा म्हणून समोर आले, त्यांनी आपल्या क्षमता दाखवून दिल्या आहेत. 

एनडीएच्या यशाबद्दल बोलायचे तर बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे योगदान मोठे आहे. नितीश यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरतो आहे याचा अंदाज त्यांना होता. त्यांनी भाजपकडे जास्त जागा घेतल्या. नितीश यांच्या अडेलतट्टूपणाला त्यांनी जुमानले नाही. परिणामी भाजपला मागच्यापेक्षा २१ जागा जास्त मिळाल्या. त्यांनी आपली रणनीती कुशलता दाखवून चिरागला बरोबर घेतले आणि राजदला जेरीस आणले. आता नितीश कुमार भाजपवर डोळे वटारण्याच्या स्थितीत अजिबात नाहीत. भाजप आता मोठा भाऊ झालाय. भाजपची चाल नितीश यांच्या लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. भाजपने नितीश यांच्या जमिनीवर कब्जा केला आहे. पुढच्या निवडणुकीत ते उरलीसुरली जमीनही घालवून न बसोत; पण ती पुढची गोष्ट आहे. आपली ही शेवटची निवडणूक असे ते म्हणालेही होते. 

शक्य तेथे आणि तेव्हा मित्रपक्षाला खच्ची करायचे, असेच भाजपचे डावपेच असतात! महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत हेच केले; पण ते शिवसेनेच्या लक्षात आले आणि त्या पक्षाने भाजपची साथ सोडली. नितीश अशा स्थितीत अडकले की त्यांना भाजपची साथ सोडताही येत नव्हती. या सगळ्यात सर्वाधिक नुकसान बिहारचे झाले आहे. एनडीए आणि नितीश कितीही दावे करोत त्यांच्या राजवटीत बिहारमध्ये काहीही बदललेले नाही. मागास राज्य हा शिक्का आजही आहे. सत्तेची ताकद जिंकली; पण बिहारचा सामान्य माणूस हरला, हेच खरे!

- vijaydarda@lokmat.com 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी