शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

बीड नव्हे, हे तर ‘गँग्स ऑफ वासेपूर’ !

By नंदकिशोर पाटील | Updated: December 17, 2024 15:20 IST

जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे. दरवर्षी वीसेक लाख मजुरांना ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जावे लागते. हे चित्र बदलायचे असेल, तर ही गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

- नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर

२०१२ साली प्रदर्शित झालेला दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपट असो की, अलीकडेच नेटफ्लिक्सवर गाजलेली ‘मिर्झापूर’ नावाची वेब सिरीज. झारखंडमधील कोळसा माफिया आणि उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी विश्वावर आधारित या दोन्ही कलाकृतींमध्ये दाखविलेली हिंसा, गुंडागर्दी, स्थानिक माफियांची दहशत, खंडणी बहाद्दर आणि याच गुंडांच्या टोळ्यांवर गब्बर झालेले बाहुबली पाहिल्यानंतर आपल्या अंगाचा थरकाप उडतो. परंतु, हे काल्पनिक चित्रपट आणि वेबसिरीज देखील फिके वाटावेत, अशा गुन्हेगारी घटनांची मालिका सध्या बीड जिल्ह्यात सुरू आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि नंतर झालेल्या खुनाच्या बातमीची शाई वाळत नाही तोच परळीतील एका उद्योजकाचे अपहरण होते. अपहरणाचा गुन्हा दाखल होईपर्यंत बीडमध्ये आठवले गँगकडून गोळीबार केला जातो. परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात येते. गेल्या वर्षभरातील गुन्हेगारी घटनांची आकडेवारी पाहिली, तर या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट शिल्लक राहिली नसल्याचे दिसून येते. गेल्या अकरा महिन्यांत तब्बल ३६ जणांचे खून झाले आहे, म्हणजेच दरमहा दोन जणांचा जीव घेतला गेला, तर १६८ जणांच्या खुनाचा प्रयत्न झाला. या जिल्ह्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी पाहिली, तर बीडने बिहारला देखील मागे टाकले असल्याचे दिसून येईल. वर्षभरात १५६ महिला/तरुणींवर बलात्कार झाले असून, विनयभंगाच्या ३८६ घटनांची नोंद झाली आहे. याचाच अर्थ, दरदिवशी एकीचा विनयभंग होतो आणि दिवसाआड एकीवर बलात्कार!

या प्रकरणांमध्ये वरवर जरी काही गोष्टी समोर आल्या असतील, तरी या घटनेच्या मुळाशी गेल्यास पवन ऊर्जा, सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील नवीन प्रकल्पांशी संबंधित अनेक गंभीर बाबी उजेडात येतील. या जिल्ह्यातील हिंसक घटनांमागे जातीय द्वेष हेच एकमेव कारण नसून, आर्थिक हितसंबंधातून या घटना घडल्याचे दिसून येईल. आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या तोंडून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेचा घटनाक्रम ऐकल्यानंतर आपल्या अंगाचा देखील थरकाप उडतो. बीड जिल्ह्यातील कोरडे हवामान आणि गतिमान वारे पवन ऊर्जेसाठी पोषक असल्याने गेल्या काही वर्षांत या जिल्ह्यात रिन्यू पॉवर, टाटा, स्टरलाइट, अवाडा, टोरंट पॉवर, इ. यांसारख्या अनेक नामांकित कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मोठमोठे पवनचक्की आणि सौर ऊर्जेचे प्रकल्प उभे केले आहेत, परंतु मागील काही वर्षांमध्ये या सर्व गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप, स्थानिक गुंडागर्दी, दहशत, खंडणी बहाद्दर आणि वसुलीखोर लोकांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. आ. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात नेमके याच बाबीवर बोट ठेवले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड शोधला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. आ. धस यांनी समोर येऊन याप्रकरणी ठोस भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक आहे, कारण काही जणांनी यास केवळ जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु, जिल्ह्यात गुन्हेगारी कोणामुळे वाढली, यावर धस यांनी नेमके बोट ठेवण्याचे धाडस केले.

अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत, तर सरपंच देशमुख यांच्या खुन्यातील काही आरोपी हे कराड यांचे नातेवाईक असल्याचे समजते. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले, जिल्ह्यातील काही घटनांवरून बीडचा बिहार झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. अशा घटना तर इतर जिल्ह्यांत सुद्धा घडतात! मंत्री राहिलेल्या मुंडे यांची ही प्रतिक्रिया गुन्हेगारांना पाठीशी घालणारी आणि प्रोत्साहन देणारी आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अशा प्रकारची भूमिका कधीच घेतली नव्हती. बीड हा वारकरी संप्रदायाचा जिल्हा आहे. संत भगवान बाबा यांच्यासारख्या संतांचा वारसा लाभलेला आहे. गुन्हेगारी सत्र असेच सुरू राहिले, तर ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली गुंतवणूक थांबेल. उद्योजक, व्यापारी स्थलांतर करतील. आधीच या जिल्ह्यात रोजगाराच्या संधीचा अभाव आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे. दरवर्षी वीसेक लाख मजुरांना ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जावे लागते. हे चित्र बदलायचे असेल, तर ही गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा,‘गँग्स ऑफ वासेपूर’सारख्या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे भीषण परिस्थिती उद्भवणार यात शंका नाही.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी